नवी दिल्ली – देशभरात अनेक भागांत थंडी वाढत आहे. सद्यस्थितीत उत्तर भारतात थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून, महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. तसेच पुढील काही दिवसांमध्ये थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
देशाची राजधानी दिल्लीत थंडीत वाढ झाल्याने हुडहुडी वाढली आहे. रविवारी सकाळी पंजाब, हरियाणा आणि चंडीगडमध्ये अनेक ठिकाणी दाट धुके पडल्याचे पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस विविध भागांत दाट धुके राहण्याची शक्यता आहे. वायव्य मैदानी भागात कमी उष्णकटिबंधीय पातळीमध्ये जास्त आर्द्रता असणार आहे. त्याचा परिणाम हवामानावर दिसून येणार आहे.
हिमाचल प्रदेश, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओरिसा, आसाम आणि त्रिपुरामध्ये आणखी धुके पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. पुढील तीन दिवस पंजाब हरियाणा, चंडीगड आणि दिल्लीच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसेंदिवस थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. कमाल तापमानात घट झाल्यामुळे मुंबईतही थंडी वाढली असून, मराठवाड्यासह विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात तापमानात घट झाल्याची नोंद आहे. यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसून आहेत.
दरम्यान, पुढील तीन दिवस पूर्व भारतात किमान तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसची वाढ होईल. वायव्य भारतातील बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात सुमारे दोन अंश सेल्सिअसची घट होऊ शकते. या वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतात थंडीचा जोर कायम राहणार असून, धुके पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.