शहरातील दोन तरुणांचे धाडस : बिकट परिस्थितीत यशस्वीरीत्या सर केला किल्ला
पिंपरी – कोसळणाऱ्या मुसळधार सरी… अतिशय बिकट चढाई …80 अंशांच्या कोनातून सरळ रेषेत जणू काही आभाळात घुसणारी वाट… अशा प्रकारे क्षणा-क्षणाला साहस आणि धैर्याची परीक्षा घेणारा “हरिहर’गड. पिंपरी-चिंचवड शहरातील दोन तरुणांनी “हरिहर’गड सर केला.
विशाल आरुळकर आणि पवन गुंजाळ या तरुणांनी नाशिक जिल्हा, त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेल्या “हरीहर’गड सर केला. किल्ला समुद्रसपाटीपासून 1120 मीटर उंचीवर “हरीहर’गड उभा आहे. या दोन तरुणांनी दैनिक “प्रभात’ला सांगितले की, निरगुड फाटा येथून साधारण तासाभराची खडी चढाई केल्यानंतर छोट्या पठारावर येतो. तेथे शंकराचे मंदिर व पुष्करणी तीर्थ आहे. अर्धा तास चालून गेले, की तो हरिहर गडाच्या रेखीव पायऱ्यांसमोर पोहचतो. तेथील दगडी जिना मान वर करून बघावा लागतो. ती वाटही वैशिष्ट्यपूर्ण आहे. साधारण ऐंशी अंशाच्या कोनामध्ये सरळ रेषेत ती जणू आभाळात घुसते! त्या वाटेने चढण्यास सुरुवात केली, की तिचा खरा अंदाज येतो. एकावेळी एकच मनुष्य वर किंवा खाली जाईल अशा पद्धतीची तिची रचना आहे. पायऱ्यांवर दोन्ही बाजूंनी खोबण्या आहेत. त्यात पंजा रुतवता येतो व वर चढताना त्यांचा आधार मोठा ठरतो.
सुमारे नव्वद पायऱ्यांचा सोपान चढल्यानंतर गडाचे पहिले छोटेखानी पण सुरेख प्रवेशद्वार लागते. त्या प्रवेशद्वारातून आलेली वाट पाहिली तर असे लक्षात येते, की वर येणे एकवेळ सोपे, मात्र उतरणे महाकठीण! प्रवेशद्वाराच्या पुढे, गडाच्या पोटात खोदलेला रस्ता आहे. उलट्या “सी’ इंग्रजी आकारासारखा किंवा नारळाच्या अर्ध्या करवंटीसारखा! कातळात कोरलेले दोन दरवाजे पार केल्यानंतर सुमारे एकशे तीस पायऱ्यांचा दगडी जिना आहे. त्या जिन्यासही दोन्ही बाजूस आधारासाठी असलेल्या खोबणीच्या आधारे ते पुढे गेले. त्याच्याच पुढे, वर जाण्यासाठी अप्रतिम असा दगडी बोगदा आहे. गडावर एकापेक्षा एक सरस सौंदर्याकृती पायघड्या टाकून पुढे येत राहतात. ह्या किल्ल्यावर वेताळ मंदिर आहे. पूर्वेला कापड्या डोंगर व ब्रम्हगिरी दिसतात. दक्षिणेकडे वैतरणा खोरे आहे.
असा आहे इतिहास
हरिहर उर्फ हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी 1636 साली निजामशाहीची पुन:स्थापना करतेवेळी त्र्यंबकगडासोबत हा किल्लासुद्धा जिकला. नंतर त्याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे, 1670 मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी तो गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली. मोगल सरदार मातब्बरखान याने हरिहर किल्ला 8 जानेवारी 1689 रोजी जिंकला. शेवटी, 1818 मध्ये तो गड मराठयांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला.
गडाकडे जाण्याचे मार्ग:
पहिला मार्ग: नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर त्र्यंबकेश्वरच्या 3 किमी अलीकडे डाव्या बाजूला असलेल्या गावाकडून मोखाड्याकडील रस्त्याने गेल्यास निरगुडपाडा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव लागते.
दुसरा मार्ग: नाशिक-त्र्यंबकेश्वरकडून जव्हारकडे जाणाऱ्या रस्त्याने सापगावकडे जाताना त्र्यंबकपासून 15 किमीवरच्या लागणाऱ्या हर्षवाडीकडे पोहचल्यावर किल्ल्याला जाता येते.