मुंबई : राज्यात वाढत्या ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून काही कठोर निर्बंध पुन्हा नव्याने जारी करण्यात येण्याचे सांगण्यात येत आहे. त्याच निर्बंधांचा फटका गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाळावर देखील बसणार आहे. याविषयीचे संकेत खुद्द शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी दिले आहेत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आढावा घेऊन शाळांबाबत 4 ते 5 दिवसांत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मिळत आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागालाही लहान मुलांच्या लसीकरणाची प्रतीक्षा आहे. लहान मुलांचं लसीकरण सुरू व्हावं अशी अपेक्षा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. शाळांबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर निरीक्षण करून घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
वर्षा गायकवाड यांनी, स्थानिक पातळीवर निरीक्षण करुन शाळांबाबत निर्णय घेतला जाईल. मुंबई, पुण्यात 15 डिसेंबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ओमाक्रॉनच्या पार्श्वभूमीवर याठिकाणच्या प्रशासनाकडून परिस्थितीचं निरीक्षण केलं जात आहे. टास्क फोर्ससोबत चर्चा करुन शाळांची नियमावली बनवली आहे. इथुन पुढेही स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून परिस्थितीचा आढावा घेऊन गरज पडल्यास पुढील निर्णय घेतले जातील, असे म्हटले आहे.
लहान मुलांच्या लसीकरणाबाबत कोणतीही माहिती शालेय शिक्षण विभागाकडे आलेली नाही. मात्र, लहान मुलांचं आरोग्य, सुरक्षा ही प्राथमिकता आहे. त्यामुळे लहान मुलांचे लसीकरण सुरु व्हावं अशी आमची अपेक्षा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे की, शाळांबाबत अजुनही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे वाट पाहावी लागेल. आपण तिसऱ्या लाटेला थोपवू असेही त्यांनी म्हटले आहे.