नवी दिल्ली –पहिल्या तिमाहीत विकासदर उणे 23.9 टक्के झाला असला तरी लवकरच विकासदर पुन्हा उसळेल, असा दावा अर्थ मंत्रालयाचे मुख्य सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनी केला आहे.
सोमवारी विकासदर कोसळण्याची विदारक आकडेवारी जाहीर करण्यात आली. सुब्रमण्यन म्हणाले की, मंदी दोन प्रकारांची निर्माण होते. एक मंदी म्हणजे इंग्रजी व्ही आकाराची असते. यामध्ये निर्देशांक वेगात कमी होऊन तो नंतर तेवढ्याच वेगात वाढतो. सध्या भारताबाबत असा प्रकार घडला आहे. दुसरी मंदी ही इंग्रजी यू आकाराची असते. यात विकासदर हळूहळू तळाला जातो. त्यानंतर तो हळूहळू वाढतो. यामध्ये विकासदर कमी होण्याचा वेग आणि वाढण्याचा वेगही कमी असतो. भारताबाबत सध्या असा प्रकार घडलेला नाही, असा दावा त्यांनी केला.
व्ही प्रकारात विकासदर वेगात कोसळतो आणि तेवढ्याच वेगात वाढतो. भारतीय अर्थव्यवस्थेबाबत करोनामुळे असेच झाले आहे. पहिल्या तिमाहीमध्ये विकासदर आकडेवारी प्रथमच उणे 23.9 टक्के या पातळीवर पोहोचली आहे. आता बऱ्याच क्षेत्रांमध्ये काम सुरू झाले आहे. त्यामुळे विकासदर दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीत वेगात वर येऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.
केंद्र सरकारने मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर लगेच मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत लघुउद्योगांना आणि इतर उद्योगांना केली आहे. त्यामुळे या सर्व क्षेत्राची उत्पादकता वाढू लागली आहे. आता आगामी महिन्यात येणाऱ्या दिवाळीच्या सणावेळी ग्राहकांकडून खरेदी वाढेल अशी अपेक्षा आहे. विकासदर कोसळणार आहे याची दखल घेऊनच रिझर्व्ह बॅंकेने वेळोवेळी व्याजदर कपातीच्या आणि भांडवल सुलभतेच्या उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा घसारा कमी होण्यास मदत झाली आहे.