स्वातंत्र्यानंतर अर्थव्यवस्थेवर पहिल्यांदाच इतका मोठा परिणाम
नवी दिल्ली – लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर नेमका किती परिणाम होणार याचे अंदाज अनेक जण बांधीत आहेत. इन्फोसिसचे संस्थापक नारायणमूर्ती यांनी विकासदर स्वातंत्र्यानंतर प्रथमच मोठ्या नीचांकी पातळीवर जाणार असल्याचा इशारा दिला आहे.
सोमवारी नारायणमूर्ती यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की, 1947 नंतर प्रथमच देशाच्या विकासदरावर एवढा परिणाम होणार आहे. त्यामुळे रोजगार टिकविण्यासाठी अर्थव्यवस्थेला शक्य तितक्या लवकर पूर्वपदावर आणण्याची गरज आहे. त्याचबरोबर दुर्दैवाची बाब म्हणजे करोना व्हायरसवर औषध उपचार निघाले तरी संपूर्ण देश यातून मुक्त होण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो. अशा परिस्थितीत आपल्याला अर्थव्यवस्था उभी करायचे काम करावे लागणार असल्याचे नारायणमूर्ती म्हणाले.
रिझर्व्ह बॅंकेने विकासदर शून्य टक्क्यांच्या खाली जाणार असल्याचे सांगितले आहे. पण शून्य टक्क्याच्या खाली किती जाणार हे आकडेवारीत स्पष्ट केलेले नाही. जागतिक पतमानांकन संस्थांनी भारताचा विकासदर पाच टक्के होईल असे सांगितले आहे. मात्र, अमेरिका आणि इतर विकसित देशांचे विकासदर यापेक्षा कमी होणार आहेत. त्या तुलनेत भारताची परिस्थिती ठीक आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. लॉकडाऊनमुळे देशातील जनतेची क्रयशक्ती कमी झाल्यामुळे खरेदी होत नाही. जागतिक बाजारातून मागणी नसल्यामुळे निर्यात होत नाही. त्यामुळे भारतीय उद्योगक्षेत्राची उत्पादकता कमी
होत आहे. त्याचा परिणाम विकासदरावर होणार आहे.
राहुल गांधींची सरकारवर टीका
राष्ट्रीय उत्पन्न मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या नारायणमूर्तीच्या वक्तव्यानंतर कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी “मोदी है तो मुमकिन है’ अशी तिरकस प्रतिक्रिया व्यक्त केली. सध्याच्या सरकारकडे अर्थव्यवस्थेला कसे बाहेर काढायचे याची समज नाही. त्याचबरोबर विकासदर वाढावा यासाठी उपाययोजना करण्याकरिता सरकारकडे इच्छाशक्ती नाही, असा आरोप गांधी यांनी केला.