मुंबई – अगोदरच मंदी असताना करुणा व्हायरसमुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. याचा नेमका परिणाम अर्थव्यवस्थेवर किती होईल याचे मूल्यांकन करण्यात चालू आहे. मूडीज या पतमानांकन करणाऱ्या संस्थेने सध्याच्या परिस्थितीच्या आधारावर भारताचा विकास दर या वर्षी केवळ 2.5 टक्के होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.
या अगोदर या पतमानांकन संस्थेने भारताचा विकास दर 5.3 टक्के होईल असे सांगितले होते. मुळात भारतात भांडवलाचा वापर कमी होत आहे. त्यातच करोना व्हायरसमुळे परिस्थिती बिघडली आहे.
सर्व उद्योगांचे कामकाज गेल्या एक महिन्यापासून कमी-अधिक प्रमाणात बंद झाले आहे. विमान रेल्वे आणि इतर वाहतूक थांबलेली आहे. त्यामुळे वाहन क्षेत्रासह मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र बंद आहे. सोशल डिस्टन्सींगमुळे सेवा क्षेत्रही एक महिन्यापासून काम करीत नाही. या सर्व बाबीचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे.
त्यातून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेने गेल्या आठवड्यात धाडसी उपाययोजना केल्या आहेत. यामुळे परिस्थिती सुधारल्यानंतर कामकाज वेगाने सुरू होण्यास मदत होईल आणि त्याचा फायदा पुढील वर्षी विकास दर वाढण्यात होऊ शकतो. मात्र सध्याच्या परिस्थितीत सध्या तरी विकास दर 2.5 टक्के होण्याची शक्यता या संस्थेला वाटते.
केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेने बाजारात मोठी भांडवल सुलभता निर्माण केली आहे. यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या धोरणांमध्ये यामुळेच महागाई किती वाढेल याची आकडेवारी दिलेली नाही.