नागपूर – उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा गट एकत्र येईल. महाविकास आघाडी तुटेल. त्यामुळे शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची वेळच येणार नाही, असा दावा महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमधील नेते व ज्यांची बुधवारीच कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी झाली अशा आशिष देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकते, हे पुन्हा एकदा खरे ठरणार का, याचीच चर्चा सुरू झालीय.
कोणालाही अपात्र व्हायला आवडणार नाही. एखादा पक्ष, नेता आपला आमदार अपात्र होऊ देणार नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. हे पाहता सध्याच्या महाविकास आघाडीमधल्या जागावाटप चर्चेला अर्थ नाही. कधीही उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे गट एकत्र येऊ शकतात.
नंतर शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाऊ शकते, असा दावा देशमुख यांनी केला. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात काही दिवसांपूर्वी सुनावणी आली. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता, तर आम्ही तुमचे सरकार आणले असते, इथपर्यंत सरन्यायाधीशांनी टिप्पणी केली. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. तर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असे आदेश त्यांनी दिले होते.
कारवाईची गरज नाही
आता विधानसभा अध्यक्ष डॉ. राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार, शिंदे गटाचे आमदार अपात्र होणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. तत्पूर्वीच आशीष देशमुख यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. ही कारवाई समजा झालीच तर ती सहा वर्षांसाठी असेल. ती झाली, तर अनेकांचे राजकीय करिअर संपेल, त्यामुळे अशी रिस्क ते घेणार नाहीत, असेही देशमुखांनी सांगितले.