ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांना पाणी बचतीच्या सूचना
पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर ः गावातील नळांना आठ दिवसांआड पाणी
ग्रामस्थांच्या नजरा रोटेशनकडे
या परिस्थितीवर पर्याय म्हणून साठवण तलाव भरण्यासाठी पाटपाण्याचे रोटेशन सुटणार आहे. ते यायला जवळपास 15 दिवसांचा अवधी लागणार असल्याने, ग्रामस्थांच्या नजरा आता या रोटेशनकडे लागल्या आहेत.
कोल्हार खुर्द – राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी, कुपनलिका, साठवण तलावाने तळ गाठला असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. यंदा उन्हाच्या तीव्रतेने अवघा महाराष्ट्र घामाघूम झाला. त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती ओढवली. जवळपास नगर जिल्ह्यातील 70 ते 80 टक्के गावांना पाण्याचे टॅंकर सुरु झाले. मात्र प्रवरा नदीच्या तीरावर असलेल्या कोल्हार खुर्दसारख्या गावाला कधी-कधी पिण्याच्या पाण्याची समस्या सहसा जाणवली नाही.
कारण या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी एक विहीर, कूपनलिका, तसेच पाटाचे पाणी आल्यानंतर ते साठवण्यासाठी साठवण तलाव अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत, मात्र यंदा उन्हाळ्याने मात्र या सर्व सुविधांवर मात करीत गावकऱ्यांवर पाणीटंचाईची संक्रांत आणली आहे. उष्णतेच्या पाऱ्याने कमालीची मर्यादा ओलांडल्याने जमिनीतील पाणीपातळी घटली आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यासाठी असलेली कूपनलिका, विहीर या दोन्ही सुविधांनी तळ गाठला आहे. त्याचप्रमाणे साठवण तलावात असलेले पाणीदेखील बाष्पीभवनामुळे कमालीचे घटले, जवळपास हा तलाव कोरडा पडला. त्यामुळे ग्रामस्थांवर पाणीटंचाईची कुऱ्हाड पडली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने दवंडी देऊन पाण्याचा वापर काटकसरीने करण्याच्या सूचना केल्या आहेत.