सर्वपक्षीय मोर्चात जोरदार घोषणाबाजी
कराड – केंद्र सरकारने नागरिकत्व संशोधन कायदा व नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन (एनआरसी) असे कायदे संसदेत बहुमताच्या जोरावर पारित केले आहेत. देशाच्या ऐक्यास व अखंडतेस या कायद्यामुळे तडा जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे केंद्र सरकारने हे कायदे तात्काळ रद्द करावेत, या मागणीसाठी कराडमध्ये सोमवारी सर्वपक्षीय महामोर्चा काढण्यात आला.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सकाळी साडेअकरा वाजता या महामोर्चास सुरुवात झाली. यावेळी इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, नही चलेगी नही चलेगी, मोदी-शहा की तानाशाही नही चलेगी, अशा प्रकारच्या घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चेकऱ्यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी काळ्या रंगाचे फुगे हातात घेतले होते. तसेच नागरिकत्व संशोधन कायदा व नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन कायद्याला विरोध करणारे फलकही होते.
हा मोर्चा नंतर तेथून मंगळवार पेठेतील जोतिबा मंदिरापर्यंत गेला. त्यानंतर मुख्य रस्त्यावरुन हा मोर्चा कन्याशाळा, चावडी चौक, नेहरु चौक, आझाद चौक मार्गे दत्त चौकात आला. त्यानंतर पुढे तहसीलदार कचेरी समोर जाऊन प्रशासनाला आपल्या मागणीबाबत निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारने नागरिकत्व संशोधन कायदा व नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन (एनआरसी) असे कायदे संसदेत बहुमताच्या जोरावर पारित केले आहेत. देशाच्या ऐक्यास व अखंडतेस या कायद्यामुळे तडा जाण्याची शक्यता आहे. कायदे स्पष्टपणे धर्मावर आधारीत भेदभाव करतात. हा सर्व प्रकार म्हणजे संविधानाचे उल्लंघन करणे व संविधानेच्या धर्मनिरपेक्ष तत्वाला धक्का पोहचवत आहेत. आम्ही या कायद्यांचा जाहीर निषेध करतो.
या कायद्याला भारतात तीव्र विरोध होत असतानाही केंद्र सरकार हुकूमशाही पद्धतीने देशात हा कायदा लादण्याचा प्रयत्न करीत आहे. काही राज्यांनी त्यांच्या राज्यात हे कायदे लागू करण्यास स्पष्ट नकार दर्शविला आहे. केंद्र सरकारने हे कायदे तात्काळ रद्द करावेत, या आशयाचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. प्रमुख वक्त्यांनी मोर्चातील नागरिकांना नागरिकत्व संशोधन कायदा व नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन कायदा कसा चुकीचा आहे यावर विचार मांडले. त्यानंतर महामोर्चा विसर्जित करण्यात आला.