पुणे जिल्ह्यात डावणी, घडकुज आणि मणी क्रॅकिंगमुळे शेतकरी अडचणीत
रांजणी – जिल्ह्यातील शिरूर, आंबेगाव, जुन्नर, खेड आदी तालुक्यांतील हजारो एकरांतील द्राक्ष बागांना यंदा प्रतिकुल हवामानाचा फटका बसला आहे. गेल्या वर्षी द्राक्ष उत्पादकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले; परंतु नंतर पाऊस पडल्यावर सर्वकाही सुरळीत झाले होते. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा प्रतिकूल हवामानाने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणले. डावणी, घडकुज आणि मणी क्रॅकिंगच्या समस्येमुळे द्राक्ष उत्पादक संकटात सापडले आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबरमधील पावसाने द्राक्ष बागा जगल्या; परंतु द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी यंदा अडचणीत सापडले आहेत.
मुळातच यंदाचा द्राक्ष उत्पादकांचा हंगाम सुरुवातीपासूनच अडचणीचा ठरला आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात जवळपास एक हजारांहून अधिक एकरावर द्राक्षांच्या बागा आहेत. यामध्ये दरवर्षी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये बागांची छाटणी करणाऱ्या द्राक्ष उत्पादकांची संख्या सुमारे 60 टक्क्यांपर्यंत असते. यंदा 15 ऑक्टोबरपूर्वी छाटणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बागा हातच्या गेल्या.
अशा स्थितीतही काही शेतकऱ्यांनी प्रतिकूलतेवर मात करून द्राक्ष उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला; परंतु उत्पादनात मोठी घट येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. यंदा उत्पादनात फटका बसला असला तरी ऑक्टोबर 19 मध्ये आलेल्या अवेळी पावसाने पाण्याची उपलब्धता चांगल्याप्रकारे निर्माण झाली, त्यामुळे हवामानाने साथ दिल्यास ऑक्टोबरअखेर आणि नोव्हेंबरमधील छाटणीच्या बागांपासून चांगल्या उत्पादनाची आशा शेतकरी वर्ग करत आहे.
डावणी आणि घडकुजचा मोठा प्रादुर्भाव
15 ऑक्टोबर 2019 पूर्वी छाटणी केलेल्या बागांमध्ये डावणी आणि घडकुज मोठ्या प्रमाणात आल्याने बहुतांशी द्राक्षबागा संपल्या. 15 ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान छाटणी केलेल्या बागा बऱ्या स्थितीत असल्या तरी अलीकडे निर्माण झालेले प्रतिकुल हवामान द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ करत आहे.
काही शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा संपल्या आहेत तर काहींच्या सुरू झाल्या आहेत. द्राक्ष बागांना प्रतिकूल हवामानाचा फटका बसल्याने उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. असेच प्रतिकूल हवामान कायम राहिल्यास उत्पादनाची आशा असलेल्या द्राक्ष बागांमधील नुकसानीचे प्रमाण वाढण्याची अधिक शक्यता आहे.
40 टक्के बागा हातच्या गेल्या
शिवारातील द्राक्षांना व्यापाऱ्यांकडून 20 ते 60 रुपये प्रतिकिलोपर्यंत दर दिला जात आहे. टिचक्या मण्याचे प्रमाण वाढल्याने द्राक्ष दराचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यंदा जिल्ह्यातील 40 टक्के बागा हातच्या गेल्या आहेत.