नगर -करोना व्हायरसच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये गोरगरीब, मजुरांची उपासमार होऊ नये, यासाठी देशभरातील शिधापत्रिकाधारकांना तीन महिन्यांचे धान्य मोफत दिले जाणार आहे. राज्यात तीन महिन्याचे धान्य एकाच वेळी नाही, तर दरमहा लाभार्थींना वाटप करण्याचा आदेश 31 मार्च रोजी अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिला. या प्रकाराने राज्यभरातील दुकानदारांसह पुरवठा यंत्रणेचाही जीव भांड्यात पडला, तर धान्य वाटप प्रक्रियेत कुठल्याही टप्प्यावर हलगर्जी झाल्यास संबंधितांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
केंद्र व राज्य शासनाने देशातील करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. त्यामुळे देशभरातील गरीब, मजुरांवर उपासमारीची वेळ येत आहे. त्यावर उपाय म्हणून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याव्यतिरिक्त प्रति सदस्य प्रती माह 5 किलो धान्य तीन महिने मोफत दिले जाणार आहे.
धान्य वाटपाचे हे परिमाण पाहता दुकानदार आणि यंत्रणेचा कमालीचा गोंधळ व धावपळ होण्याची शक्यता निर्माण झाली होती.त्यावर शासनाने 31 मार्च रोजी दिलेल्या आदेशानुसार अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे. माहे एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांसाठी दिलेल्या अन्नधान्याच्या नियमित नियतनानुसार धान्याचे वाटप त्या-त्या महिन्यात केले जाणार आहे. या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
एप्रिल महिन्यात धान्य नियमित वाटप होणार असून प्रति सदस्य 5 किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. मे व जून या दोन महिन्यासाठी ही योजना लागू राहणार असून प्रत्येक महिन्यांत कुटुंब योजनेंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी गहू 3 किलो, तांदूळ 2 किलो तसेच अंत्योदय योजनेंतर्गत प्रतिकार्ड गहू 26 किलो व तांदूळ 9 किलो असे मासिक परिमाण राहणार आहे.त्याचा दर गहू 2 रुपये व तांदूळ 3 रुपये किलो आहे. तसेच प्रत्येक लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेतून 5 किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे.
मास्क लावून आलेल्यांना धान्य
स्वस्त धान्य दुकानात धान्य घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांनी मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच दुकानात गर्दी न करता 1 मीटर अंतर ठेवून लाभार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आवश्यक आहे.
तांदूळ वाटपात कुचराई भोवणार!
नियमित धान्यासोबतच अतिरिक्त तांदूळ वाटप करण्यास जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी, उपनियंत्रक यांच्या स्तरावर कुचराई झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.
29 लाख 89 हजार 839 लाभार्थी
प्रधानमंत्री गरीब अन्न योजनेंतर्गंत जिल्ह्यात 31 लाख 10 हजार 675 लाभार्थ्यांना मोफत तांदूळ मिळणार आहे. त्यात अंत्योदय योजनचे 4 लाख 74 हजार तर प्राधान्य कुटुंबतील 25 लाख 89 हजार 765 लाभार्थ्यांचा समावेश आहे. त्यासाठी 14 हजार 949 टन धान्य लागणार आहे.