मुंबई- महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी राज्यपालांवर निशाणा साधताना राज्यपालांनी घटनेच्या चौकटीत राहून काम करावे, असे म्हटले आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी स्वतःला मुख्यमंत्री न समजता घटनेच्या चौकशीत राहून काम करावे, असे मत मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त झाल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
राज्यपाल हे घटनात्मकरित्या राज्याचे प्रमुख असले, तरी त्यांनी विधानसभेच्या अधिकारांवर वरचढ न होता काम करावे, अशी विनंती राज्यपालांना करत असल्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्यपालांनी नांदेड, हिंगोली आणि परभणीचा दौरा आयोजित केला आहे. त्यावेळी नांदेडमध्ये अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने उभारलेल्या हॉस्टेलचे उद्घाटन करणार आहेत. राज्यातील अल्पसंख्याक विभागाला कुठलीही कल्पना न देता राज्यपालांनी हे कार्यक्रम आयोजित कऱणे म्हणजे राज्यात दोन सत्ताकेंद्रे उभारण्याचा प्रकार असल्याचा आक्षेप मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
राज्यपालांनी नांदेडमधील विद्यापीठाच्या कार्यक्रमाला जायला काही आक्षेप नाही. मात्र हिंगोली, नांदेड आणि परभणीत जिल्हाधिकाऱी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत ते घेणार असलेली बैठक आक्षेपार्ह असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. राज्याचे मुख्य सचिव मंत्रिमंडळ बैठकीतील माहिती राज्यपालांपर्यंत पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांना निर्णयाचे अधिकार असतात याचे भान ठेवावे.