मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून राज्यपालांच्या विधानावरून थेट महाराष्ट्र सरकारवर हल्लबोल केला आहे. तर भाजप नेत्यांकडून त्यांना पाठिंबा दिला जात आहे. अशातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका करत वेळ आली तर महाराष्ट्र बंद पाडू, शांततापूर्ण मार्गाने महाराष्ट्र बंद करू. महाराष्ट्र हा लेचापेच्यांचा नाही हे केंद्राला दाखवून देऊ. अशा शब्दात टीका केली आहे.
या सर्व प्रकरणावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत माधमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी बोलतांना त्या म्हणाल्या,’महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल हे एकमेव राज्यपाल आहेत. जे महाराष्ट्रात येऊन मराठी भाषा शिकलेत. मराठी माणसांवर त्यांचे खूप प्रेम आहे. हे मी स्वत: अनुभवलं आहे. मात्र, अनेक वेळा त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात येतो. यापूर्वीही असं अनेकदा घडलं आहे. मात्र, त्यांचे महाराष्ट्रावर प्रेम आहे, हे निश्चित” असं म्हणत त्यांनी राज्यपालांवर होत असलेल्या टीकेवर प्रतिउत्तर दिले आहे.