पुणे : करोनामुळे गेल्या एक ते सव्वा महिन्यापासून देशाच्या अर्थचक्राला ब्रेक लागला आहे. त्यामुळे या अर्थ चक्राला थोडी गती मिळावी व नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाने काही दुकाने अटी शर्तींवर आजपासून सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, याबाबत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट न केल्याने ग्रामीण भागात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशावर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी जोर धरत आहे.
केंद्राच्या आदेशानुसार दुकाने उघडण्यास या अटी लागू ?
* महानगरपालिका आणि नगरपरिषद हद्दीतील फक्त निवासी भाग व परिसरातील दुकाने या आदेशानुसार उघडता येणार आहेत.
* जी दुकाने नोंदणीकृत आहेत त्यांनाच ही परवानगी असणार आहे.
* दुकानात 50 टक्के कर्मचारीच काम करू शकतील.
* त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन करायचं आहे
* मास्क व हँड ग्लोव्हज वापरणे बंधनकारक असेल
* शॉपिंग मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स उघडण्यास परवानगी नाही.
हे असेल बंद
▪️करोना हॉटस्पॉट तसेच कंटेनमेंट झोनमधील दुकाने मात्र पूर्णपणे बंद राहणार आहेत. या भागांत दुकाने उघडण्याची मुभा मिळणार नाही, असे आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
▪️ पालिका व नगरपरिषद हद्दीतील बाजारपेठांमध्ये जी दुकाने आहेत ती 3 मे पर्यंत उघडण्यास मनाई असेल. मात्र नगरपालिका व महानगरपालिका हद्दीबाहेरची सर्व दुकाने उघडण्यास परवानगी आहे .
▪️ सिंगल ब्रॅण्ड व मल्टिब्रॅण्ड मॉल्स उघडण्यासही परवानगी नसेल.