जळगाव – आज ठाकरे गटाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जळगावमधील पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे. या अनुषंगाने ठाकरे गट जळगावात जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. तत्पूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत हे सरकार पंधरा दिवसात गडगडणार असल्याचा इशारा दिला आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. सरकारच डेथ वॉरंट निघालं असून सरकार गडगडणार आहे पुष्पचक्र अर्पण करा असा थेट इशारा राऊत यांनी यावेळी दिला. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
प्रत्येकजण आपापली गणित मांडत आहेत. परंतु आम्ही निकालाची वाट पाहत आहोत. सध्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या चाळीस लोकांचे राज्य येत्या पंधरा ते वीस दिवसात गडगडल्याशिवाय राहणार नाही असं स्पष्ट मत यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केले. तसेच मी गेल्यावेळी देखील फेब्रुवारी महिन्यात हे सरकार कोसळणार असलयाचे म्हंटले होते मात्र न्यायालयाचा निकाल उशिरा लागत आहे अशी आठवण देखील यावेळी संजय राऊत यांनी करून दिली.
ठाकरेंच्या सभेपूर्वी राजकारण तापले
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जळगावमधील पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे. मात्र या सभेपूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘संजय राऊत यांनी चौकटीत बोलावं, नाही तर मी उद्धव ठाकरे यांच्या पाचोऱ्यातील सभेत घुसून दाखवेल,’ असे म्हंटले होते. या विधानानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. यामुळे या सभेसाठी पाचोऱ्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.