नवी दिल्ली – अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रीन एक्सप्रेस हायवेच्या बांधकामावर सरकार सात लाख कोटी रुपये खर्च करीत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी याबाबतची माहिती दिली.
यावेळी ते म्हणाले की, यामुळे देशातील परिवहन अधिक स्मार्ट होईल. त्याचबरोबर प्रदूषणाची पातळी कमी होण्यास मदत होईल. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सने डिजिटल पद्धतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते.
या कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, 1 लाख कोटी रुपये खर्च करुन दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे पुढील एक वर्षात पूर्ण होईल. त्याचबरोबर दिल्ली-मेरठ एक्सप्रेस वेचे उद्घाटन एक-दोन महिन्यांत होईल. नॅशनल रोड अँड हायवे समिटमध्ये गडकरी म्हणाले की, आम्ही ग्रीन हायवेच्या बांधकामावर सात लाख कोटी रुपये खर्च करीत आहोत. यामुळे देशातील वायू प्रदूषण कमी होण्यास, रहदारी सुलभ होण्यास आणि लॉजिस्टिक्स तसेच वाहतुकीचा खर्च कमी होण्यास मदत होईल.
अत्याधुनिक तंत्रज्ञान व अभियांत्रिकीच्या माध्यमातून हे महामार्ग तयार करण्यात येत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. यामुळे रहदारी इंटेलिजेंट होईल आणि त्याच वेळी पर्यावरण संरक्षणावर लक्ष केंद्रित केले जाईल.