मुंबई – कोरोनाच्यासंदर्भात सरकार यापुढे अधिक धोका पत्करणार नाही. कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्यातील काही भाग सीलबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी बंदीआदेश जारी केले आहेत. या बंदी आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना तुरुंगात टाकले जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिला.
करोनाच्या पार्श्वभूमिवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा संवाद साधला आहे.
कोरोनाच्या रुग्णसंख्येत दररोज शेकड्यांनी वाढ होत आहे. ही वाढ चिंताजनक असून नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वर्तन ठेवले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच कोरोनाच्या संदर्भात सरकार यापुढे अधिक धोका पत्करणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
कोरोना संसर्गाची साखळी तोडणे आणि नागरिकांचा जीव वाचवणे हे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून देशातील प्रत्येक व्यक्तीचं आज एकमेव कर्तव्यं आहे. त्यासाठी घराबाहेर न पडणं, बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात न येणं, कोरोनाला प्रसाराची संधी न देणं आणि कोरोनाची साखळी तोडणं, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पुढील सूचना येईपर्यंत सण, उत्सव, पूजा, अर्चा, यात्रा, जत्रा, प्रार्थना, धार्मिक कार्ये ही घरातंच करावीत, कुणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
हनुमान जयंतीला घरातच थांबा
लक्ष्मणाचे प्राण वाचविण्यासाठी हनुमानाने औषधी झाडासह संपूर्ण पर्वत उचलून आणल्याचे वर्णन रामायणात आहे. आज जनतेला कोरोनापासून वाचवण्यासाठी हनुमानासारखे पर्वत उचलण्याची नाही तर, हनुमान जयंतीला घरातच थांबण्याची गरज आहे, असे सांगून पवार यांनी उद्या (बुधवार) हनुमान जयंतीला घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले.
दरम्यान, मुस्लिम बांधवांनीही उद्याच्या शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये. पूजा, अर्चा, प्रार्थना घरातच करावी, असेही त्यांनी सांगितले.