नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारला सत्तेत येऊन दुसरा टर्म सुरु आहे. या दोन्ही वेळेत सरकारने देशाला ऐतिहासिक निर्णय घेत विरोधकांना धक्का दिला होता. दरम्यान, आजच्या ५ ऑगस्टच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत का असा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे.
मोदी सरकार पुन्हा एकदा विरोधकांना धक्का देणार का? यंदा ५ ऑगस्टला मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्याची सुरू केलेली परंपरा मोडणार? हे पाहणे गरजेचे आहे. मोदी सरकारसाठी ५ ऑगस्ट हा खास दिवस आहे. ५ ऑगस्ट हा दिवस आहे ज्यादिवशी मोदी सरकार भाजपाच्या अजेंडा पूर्णत्वास नेते.
८ ऑगस्ट २०१९ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केले होते. तेव्हा मोदी म्हणाले होते की, एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अटलजी आणि कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न पूर्ण झालं आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये नव्या युगाला सुरुवात झाली आहे. ही तीच तारीख आहे ज्यादिवशी मोदी सरकारने संसदेत जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला होता.
५ ऑगस्ट ही तीच तारीख आहे ज्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या स्वप्नाचा पाया रचला. २०२० मध्ये याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत जाऊन श्री राम मंदिराचे भूमिपूजन केले. यंदाच्या ५ ऑगस्ट रोजी मोदी सरकार काय करणार? या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानामुळे उत्सुकता वाढली आहे. अमित शहांच्या उपस्थितीत योगी आदित्यनाथ ज्याप्रकारे भाजपा ५ ऑगस्टचे महत्त्व सांगत होते. त्यामुळे यंदा नेमकं काय होणार? अशी चर्चा सुरु झाली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, ५ ऑगस्ट हा पवित्र दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ५ ऑगस्टला सर्जिकल स्ट्राईक झाले होते. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवले होते. याच दिवशी प्रभू राम मंदिराच्या भव्यदिव्य बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात ५ ऑगस्ट खूप महत्त्वाची मानली जाते. भाजपा जन्मापासून आजपर्यंत, अटलबिहारी वाजपेयींपासून नरेंद्र मोदीपर्यंत सर्वांचे ३ मोठी स्वप्न आहेत. जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवणं, अयोध्येत राम मंदिर बांधणे आणि तिसरं समान नागरिक कायदा. या ३ पैकी २ पूर्ण झाली आहेत. त्यासाठी ५ ऑगस्ट दिवस निवडण्यात आला आहे.