इस्लामपूर – राज्यात पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार येणार आहे. आम्हाला चोवीस तास शिव्या देणाऱ्या विरोधकांनीही माझ्या दुसऱ्यांदा मंत्रीपदाच्या होणाऱ्या शपथविधीला उपस्थित रहावे अशी खोचक टिप्पणी करत विधानसभा निवडणुकीत गौरव नायकवडी यांचा विजय सूर्यप्रकाशाइतका सत्य असल्याचा विश्वास मंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार गौरव नायकवडी यांच्या प्रचारार्थ शिगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. गौरव नायकवडी, वैभव शिंदे, स्वरुप पाटील, सागर खोत उपस्थित होते.
ते म्हणाले, मंत्रीपदाच्या माध्यमातून तालुक्यातील विविध गावांमध्ये मोठी विकासकामे राबवली आहेत. उर्वरीत प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी भविष्यात पाठपुरावा केला जाईल. आपली नाळ सामान्य जनतेशी आहे. आम्हाला जनतेने भरभरून दिले आहे. त्यामुळे विरोधकांकडून होणाऱ्या टिकेबाबत आम्हाला चिंता नाही. या विधानसभा निवडणुकीत मी व महायुती शासनाने केलेल्या विकासकामांच्या जोरावर गौरव नायकवडी यांचा विजय निश्चित आहे.
गौरव नायकवडी म्हणाले, मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासाठी जनतेने मला साथ द्यावी. मला दिलेले एकही मत वाया जाणार नाही. त्या शिवाय जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. राजेंद्र पाटील, नागेश शिसाळे, पांडूरंग शिसाळे, सर्जेराव पाटील, सुभाष बनसोडे, तानाजी जगताप, बाबुराव पाटील, ऍड्. एच. के. पाटील, शिवप्रसाद पाटील, ऍड्. सचिन पाटील उपस्थित होते.