नाशिक – महाराष्ट्र नवनिर्माण सेना जोपर्यंत परप्रांतीयांच्या मुद्द्याबाबत बदल करत नाही, तोपर्यंत मनसे-भाजप युती शक्य नाही, असे प्रतिपादन भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. ते नाशिमध्ये बोलत होते.
तसेच यावेळी त्यांनी राज्य सरकारलाही लक्ष्य केले. या सरकारमधील मंत्र्यांचे नातेवाईक ड्रग माफियाच्या धंद्यात आहेत. चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दबाव आणणे सुरू आहे. खरे तर विधानसभा निवडणुकीत आम्हाला जनतेने स्पष्ट कौल दिला. मात्र, राज्यात दगाफटका करून अमर अकबर अँथनीचे सरकार आले. या राज्यातली जनता सरकारवर नाराज असल्याने, 2024 मध्ये भाजप स्वतंत्र लढून तिन्ही पक्षांना चारी मुंड्या चित करेल असा दावा करायलाही ते विसरले नाहीत.
राज्यात उसळलेल्या हिंसाचारावर बोलताना दानवे म्हणाले, अतिक्रमण काढावे, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. त्रिपुरामध्ये घटना घडली मात्र, त्याचे पडसाद मालेगाव, अमरावतीमध्ये कसे, त्यांच्या मागे एखादी शक्ती आहे.
खरे तर संजय राऊत यांचा आढावा घ्यायचा असेल, वेगळी प्रेस घ्यावी लागेल. सुधीर मुनगंटीवार यांची क्लिप आपण बघितली, पण उद्धव ठाकरे यांची देखील क्लिप बघा. ते म्हणतात, आमच्या राज्यात एकही संप होणार नाही. अन्यथा आमचा मंत्री जाऊन समाधान काढेल. त्या क्लिपची देखील दखल घेतली पाहिजे असे त्यांनी नमूद केले.