“अम्मी’चे अध्यक्ष डॉ. एकनाथ खेडकर यांची मागणी
पुणे : देशात 3 हजार 90 मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट असून त्यामध्ये 3 लाख 73 हजार 436 विद्यार्थी शिक्षण घेतात. तर महाराष्ट्रातील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटची संख्या 367 असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी 143 मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट संलग्न आहेत. त्यात 17 हजार 724 विद्यार्थी शिक्षण घेतात. करोनामुळे देशासह महाराष्ट्रातील सर्व मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे राज्य शासनाने या शिक्षण संस्थांना मदत करावी, अशी अपेक्षा असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ एमबीए /एमएमएस इन्स्टिट्यूटतर्फे (अम्मी) करण्यात आली आहे.
मॅनेजमेंट अभ्यासक्रमाचे शुल्क इतर अभ्यासक्रमाच्या तुलनेत जास्त असल्यामुळे विद्यार्थ्यांना टप्प्या- टप्प्याने शुल्क भरण्यासाठी सवलत दिली जाते. विद्यार्थी एप्रिल-मे महिन्यात इन्स्टिट्यूटकडे शुल्क जमा करतात. मात्र, करोनाच्या संकटामुळे विद्यार्थी इन्स्टिट्यूटकडे शुल्क जमा करू शकले नाही. त्यातच कोरोनामुळे शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारू नये,असा सूर सर्वच क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.
“अम्मी’चे अध्यक्ष डॉ. एकनाथ खेडकर म्हणाले, मागील शैक्षणिक वर्षाचे शुल्क विद्यार्थ्यांनी जमा केले नाही. तसेच पुढील शैक्षणिक वर्षातील शुल्क केव्हा जमा हे सांगता येत नाही. विद्यार्थ्यांकडून शुल्क जमा होत नसल्यामुळे मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा काही टक्के खर्च उचलावा. तसेच आर्किटेक्चर, फार्मसी, इंजिनिअर आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या इन्स्टिट्यूटला सुध्दा मदत करावी.
शिक्षण क्षेत्र देशाच्या विकासाचा पाया आहे. परंतु, या शिक्षण संस्थांमधील प्राध्यापकांचे पूर्ण वेतन देणेही आता अडचणीचे झाले आहे. शिक्षण संस्था खिळखिळ्या झाल्या तर देशाच्या विकासावरही परिणाम होईल आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटला शासनाने मदत केली तरच या संस्था पुन्हा सुरू होऊ शकतील, असेही डॉ. एकनाथ खेडकर यांनी सांगितले.