मुंबई – राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन जाहीर केले आहे. राज्यात सामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. हे सर्व प्रश्न मांडण्यासाठी अधिवेशन लांबवण्याची मागणी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
याविषयी माध्यमांसमोर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, राज्यातील पूरग्रस्त जनतेच्या मदतीला हे सरकार अजून गेलेले नाही. अतिवृष्टीने बेजार झालेला शेतकरी प्रचंड नुकसानीला तोंड देतोय. मराठवाड्यात गोगलगायींचे संक्रमण वाढले आहे. त्यासोबतच महागाईचा सर्वात मोठा प्रश्न जनतेसमोर आहे. असे जनतेपुढे असलेले सर्व आवश्यक प्रश्न आमच्याकडून अधिवेशनादरम्यान मांडण्यात येतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
मागील अनेक दिवसांपासून राज्यात पूर आहे. यात दहा-बारा वेळा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वाऱ्या झाल्या. त्यावेळी मदत मागण्याची गरज होती. मात्र मदतीसाठी एक बैठकही झाली नाही. त्यांना फक्त मंत्रिमंडळ स्थापनेची चिंता होती. महाराष्ट्रातील जतनेला वाऱ्यावर सोडून यांचे सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सुरु होते, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.
राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे एनडीआरएफची टीम प्रत्येक ठिकाणी तैनात करणे गरजेचे आहे. आता राज्य सरकार सत्कार आणि सोहळ्यातून मोकळे होऊन संकटात असलेल्या राज्यातील जनतेला वाचविण्यासाठी प्रयत्न करेल, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.