नवी दिल्ली – देशात करोनाचा आता वेगाने प्रसार होत आहे. रोज 10 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण समोर येत आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)च्या सर्व्हेनुसार देशात आतापर्यंत समूह संसर्ग नसल्याचा दावा केला आहे. मात्र, व्हायरोलॉजी, पब्लिक हेल्थ ऍन्ड मेडिसिनच्या तज्ज्ञांनी हा दावा फेटाळून लावला आहे.
एम्सचे माजी संचालक डॉ. एम. सी. मिश्रांच्या मते, यात कोणतीही शंका नाही की, देशातील अनेक भागांत करोनाचा समूह संसर्ग सुरू आहे. त्यांनी म्हटले आहे की, मोठ्या प्रमाणावर झालेले स्थलांतर आणि लॉकडाऊनमध्ये दिली गेलेली शिथिलता यामुळे करोनाचा प्रसार वेगाने होत आहे.
आता ही साथ अशा भागात पसरत आहे जिथे या अगोदर करोनाचा एकही रुग्ण नव्हता. आता वेळ आली आहे की, सरकारने हे मान्य करावे की, देशात समूह संसर्गाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लोकांमध्ये जागृकता निर्माण होऊन लोक करोनापासून वाचण्यासाठी काळजी घेतील.
आयसीएमआरच्या सर्व्हेबाबत बोलताना ते म्हणाले की, जवळपास 2 लाख 64 हजार रुग्णांचे नमुने घेतले गेले होते. जे करोनाच्या व्यापक संसर्गाला पाहता पुरेसे नाही. देशाची मोठी लोकसंख्या आणि विविधता पाहता केलेला हा सर्व्हे देशातील करोनास्थितीचे वास्तविक चित्र नाही.
प्रसिद्ध व्हायरोलॉजिस्ट शाहिद जमीलने म्हटले आहे की, भारत खूप अगोदरच समूह संसर्गाचा शिकार झाला आहे. त्यांनी म्हटले की, सरकार मात्र हे मान्य करण्यास तयार नाही.
आयसीएमआरच्या अहवालात सांगितले आहे की, कोविड पॉझिटिव्ह आढळलेले 40 टक्के रुग्ण परदेशात गेलेले नव्हते तसेच कोणत्याही करोना विषाणूग्रस्त रुग्णांच्या संपर्कात ते आलेले नव्हते. हा
समूह संसर्ग नाही तर मग काय आहे?
प्रसिद्ध सर्जन अरविंद कुमारने म्हटले की, जर आयसीएमआरच्या अहवालाला एक वेळ मान्य केले तरी या वस्तुस्थितीला नाकारले जाऊ शकत नाही की, दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबई यांसारख्या शहरांमध्ये समूह संसर्ग आहे.
दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयाचे डॉ. कुमार यांनी म्हटले की, भारत मोठा देश आहे आणि प्रत्येक राज्यांत विषाणूची स्थिती वेगवेगळी आहे. एप्रिल महिन्यात आपण सुस्थितीत होतो. एप्रिल महिन्यातील करोना रुग्ण संख्येची सध्याच्या रुग्णसंख्येशी तुलना केली असता असा दावा करणे चुकीचे आहे की, भारत अजूनही समूह संसर्गाच्या स्थितीत नाही.