नवी दिल्ली : देशातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून सर्वाचे लक्ष करोनावरील लसीकडे लागले आहे. भारत सरकार करोना लस खरेदी करण्याचा विचार करत असून पहिल्या टप्प्यात 50 लाख डोस खरेदी करण्यासंबंधी चर्चा सुरु आहे. केंद्र सरकारकडून करोना लस मिळण्याचा पहिला मान करोना योद्धा, भारतीय सैन्य आणि विशिष्ट श्रेणीतील लोकांना दिला जाण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारचे संपूर्ण लक्ष लसीचा पुरवठा, साखळी आणि वितरणावर आहे. केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात लसीचे वितरण करण्याची योजना आखत आहे. जेणेकरुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत करोना लस पोहोचावी. वर्षाअखेर किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला करोना लस उपलब्ध होईल अशी अपेक्षा सध्या व्यक्त केली जात आहे. सोमवारी करोना लस विकसित करणाऱ्या कंपन्यांसोबत झालेल्या बैठकीत नीती आयोग सदस्य व्ही.के.पॉल आणि आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांच्या ग्रुपने कंपन्यांना करोना लसची निर्मिती, किंमत तसेच सरकार त्यासाठी कसा पाठिंबा देऊ शकते यासंबंधी प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाला देशाला संबोधित करताना करोना लसीचा उल्लेख केला होता. नरेंद्र मोदीने सध्याच्या घडीला देशात एक नाही तर तीन करोना लसींची चाचणी सुरु असल्याचे सांगितले होते. भारतात सध्या तीन कंपन्या करोनावरील लसीवर काम करत आहेत. या कंपन्या मानवी चाचणीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आहेत. तिसरा टप्पा पार पाडण्यासाठी बराच अवधी असून ती पार पडल्यानंतर लस उपलब्ध होईल असे सांगितले जात आहे.