महाळुंगे इंगळे – शेतकऱ्यांच्या जमिनीवर असलेले शिक्के काढण्याबाबत बाधित शेतकऱ्यांनी एकजूट दाखविणे आवश्यक असून, यासाठी स्थापन करण्यात आलेली समिती अथवा या भागातील शेतकरी शासनाची कसलीच दडपशाही सहन करणार नाही, असा इशारा भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.
भामा आसखेड प्रकल्पासाठी पुनर्वसन कामी अधिग्रहीत केलेल्या खेड तालुक्यातील गोणवडी, बोरदरा, काळूस, चाकण, खराबवाडी, नाणेकरवाडी, कडाचीवाडी, मेदनकरवाडी, रासे, भोसे, कुरुळी, मोई, रोहकल, वडगाव घेणंद व कोयाळी आदि प्रमुख गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर असलेले शिक्के काढण्याबाबत बाधित शेतकऱ्यांसाठी कडाचीवाडी (ता. खेड) येथे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष बैठकीत वरील इशारा देण्यात आला.
पुण्याचे पाणी अडवणार
शासनाने आमच्यासाठी असलेला कॅनल रद्द करून पुणे, पिंपरी-चिंचवडसाठी पाणी आरक्षित केले. त्यामुळे आम्हाला पाणीही नाही, आणि जमिनी मात्र बाधित झाल्या. शासनाने आमच्या मागण्या बाबत उदासिनता दाखवल्यास पुढील काळात आमचे हक्काचे पाणी पुण्याकडे नेले आहे, ते पाणी अडवण्या कामी आम्ही तीव्र आंदोलन करणार असल्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला व याबाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालक मंत्री, पुनर्वसन मंत्री, खासदार, आमदार आदींना देण्याचे ठरले.
बैठकीतील निर्णय
पैसे घेतलेल्या शेतकऱ्यांच्या जमीनी वरील शिक्के काढा
ज्या शेतकऱ्यांनी शासनाकडून पैसे घेतलेले आहेत त्यांच्या जमिनीवर त्या रक्कमेचा बोजा दाखवावा
शेतकरी पुढील तीन वर्षांच्या आत घेतलेली रक्कम शासनास अदा करेल