नवी दिल्ली– करोनावर औषध शोधले असल्याचा दावा योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने केला होता. हे औषध लॉंच करण्यात आले होते व बाजारात उपलब्ध करण्याची तयारीही सुरू झाली होती.
मात्र कोरोनिलबाबत त्यांनी जी माहिती दिली त्यावर केंद्र सरकार समाधानी नसल्याची बातमी आता समोर येते आहे. त्यांनी औषधाबाबत अधिक माहिती द्यावी असा दबाव टाकण्यात आला असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. इतकेच नव्हे, तर आयुष मंत्रालयानेही पतंजलीला 23 तारखेला एक पत्र पाठविले असून त्यांच्याकडून सविस्तर माहितीची मागणी केली आहे.
ेंकोरोनिल औषधात कोणते घटक आहेत, औषधाची चाचणी कुठे घेण्यात आली याचा खुलासाही करण्यास सांगण्यात आले असल्याचे संबंधित वृत्तात म्हटले आहे. याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार पतंजलीने कोरोनिल संदर्भात तीन दस्तावेज दिले आहेत. मात्र चौथ्या विषयावरून गोंधळाची स्थिती आहे. कोरोनिलची जी चाचणी घेतल्याचा दावा करण्यात आला आहे, त्याचे निष्कर्ष अंतरिम आहेत की अंतिम तेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत की आणखी घेतल्या जाणार आहेत, याबाबतही कोणतीही स्पष्टता सध्या तरी नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, आता हे संपूर्ण प्रकरण आयुष मंत्रालयाच्या 17 सदस्यीय टास्क फोर्सकडे सोपविण्यात आले असून ते आता पुढील तपासणी करणार आहेत. सामान्यत: कोणत्याही नव्या औषधाची चाचणी घेतली जाते तेव्हा कोणावर चाचणी घेण्यात आली, त्याचा वयोगट निश्चित केला जातो व याची माहितीही दिली जाते. कोरोनिलच्या बाबत अशी कोणीतही माहिती देण्यात आलेली नाही. पतंजली आयुर्वेद लि. चा हा पहिला वाद प्रसंग नाही. यापूर्वीही असे प्रकार घडले असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
2015 मध्ये त्यांनी खादी ग्रामोद्योग आयोगाचे व्यवस्थापन, विपणन, दर्जा सुधार याची जबाबदारी सोपविण्याचा प्रस्ताव सरकारला दिला होता. तेव्हा ज्येष्ठ नेते कलराज मिश्रा या मंत्रालयाचा कारभार पाहत होते. त्यांनी पतंजलीचा हा प्रस्ताव त्याचवेळी फेटाळला होता. उत्तर प्रदेश सरकारनेही पतंजली कडून देण्यात आलेले विविध प्रस्ताव नाकारले होते. आताही नोएडा येथील 2 हजार कोटींचा त्यांचा फूड पार्कचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे.