नवी दिल्ली – ज्या विषयांचे उत्तर देणे सरकारला अडचणीचे ठरते त्या विषयांची आकडेवारीच सरकारकडे उपलब्ध नाही, असे ठोकळेबाज उत्तर देऊन त्या विषयावरून काढता पाय घेण्याचे धोरण सरकारने अलीकडे बऱ्याच विषयांच्या अनुषंगाने अंगीकारले आहे. तसेच उत्तर आज सरकारने देशातील जमावाकडून झालेल्या हिंसक प्रकारांच्या बाबतीत दिले आहे.
दक्षता गटाकडून किंवा जमावाकडून झालेल्या हल्ल्यात किंवा हिंसाचारात किती लोक आतापर्यंत देशात ठार वा जखमी झाले आहेत, असा प्रश्न सरकारला विचारण्यात आला होता.
त्याला उत्तर देताना गृहराज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, त्या विषयीचा डाटा सरकारकडे उपलब्ध नाही. काही वेळा सोशल मीडियातील माहितीमुळे लोक हिंसक बनतात आणि काही ठिकाणी त्यातून मॉब लिंचींग सारखे प्रकार होतात, पण त्याविषयी सरकारने आता जनजागृती सुरू केली आहे, असे त्यांनी नमूद केले.
देशातील मॉब लिंचींगच्या प्रकारावर आळा घालण्याची सूचना सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दोनदा केली आहे, असेही त्यांनी सांगितले. नॅशनल क्राईम रेकॉर्डमध्ये देशातील हिंसक प्रकारांची नोंद केली जाते पण त्यांनी मॉब लिंचींग किंवा जमावाकडून होणाऱ्या हिंसक प्रकारांची स्वतंत्र आकडेवारी ठेवलेली नाही, असे मंत्र्यांनी नमूद केले.