नवी दिल्ली – देशात घुसलेल्या घुसखोरांच्या संख्येविषयी सरकारकडे नेमकी माहिती उपलब्ध नसल्याचे गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत सांगितले. ते म्हणाले की घुसखोरी रोखण्यासाठी व्यापक उपाययोजना केल्या जात असल्या तरी भारताची आंतरराष्ट्रीय सीमा रेषा खूप मोठी असल्याने दुर्गम भागातून काही जण भारताच्या मुख्य भूमित प्रवेश करण्यास यशस्वी होतात. अशा लोकांचा नेमका आकडा आज मितीला सरकारकडे उपलब्ध नाही.
घुसखोरांची संख्या मोठी असली तर त्यांच्या वास्तव्यामुळे, देशाच्या कोणत्याही भागातील लोकसंख्येचा समतोल बिघडणार नाही याची काळजी सरकार घेत आहे. घुसखोरांमुळे देशाची सामाजिक चौकट बदलणार नाही ही घटनात्मक जबाबदारी सरकारची आहे आणि आम्ही ती कसोशिने पाळू असेही त्यांनी म्हटले आहे. या प्रकारात भारतीय नागरीकांच्या मुळ हक्कांवर गदा येणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.