पुणे – शहर परिसरात आठवडाभरापासून मुक्कामाला असलेल्या थंडीचा कडाका आता कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशात मध्य केरळ ते विदर्भापर्यंत (कर्नाटक ते मराठवाडामार्गे) कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, त्यामुळे थंडीचा प्रभाव काही कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.
गेल्या आठवडाभरापासून मुक्कामी असलेल्या थंडीचा प्रभाव कमी होत असून, शहर परिसरात किमान तापमान वाढत असल्याची नोंद विभागातर्फे घेण्यात आली आहे.
शहरात गुरूवारी (दि.11) किमान तापमान 10. 1अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32. 7 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. तर राज्याच्या इतर भागांमध्येही विशेषत: विदर्भात किमान तापमानात वाढ झाली असल्याचे हवामान विभागाच्या नोंदीतून समोर आले आहे.
विशेष म्हणजे राज्यात जळगाव येथे एकाच ठिकाणी सर्वाधिक कमाल तापमान आणि किमान तापमानाची नोंद झाली असून, याठिकाणी किमान तापमान 9.5 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 34.7 अंश सेल्सिअस इतकी नोंदविण्यात आले आहे.