विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सरकारवर आरोप
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच पहिला मोठा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी घेतला होता. शेतकऱ्यांचे कर्जमाफ करून सरकारने दिलेला शब्द पाळण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, सरकारच्या याच निर्णयावर विरोधीपक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली नाही तर सरसकट धोकेबाजी केली आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करू, असे सांगणाऱ्या महाविकास आघाडीने मात्र कर्जमाफीच्या नावाखाली ‘सरसकट धोकेबाजी’च केली आहे.
– विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस@Dev_Fadnavis#ZPelection pic.twitter.com/nmLhOMCFtf— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) January 5, 2020
शेतकऱ्यांना कर्जमुक्त, चिंतामुक्त करु असे सरकारने सांगितले. सरकारने कर्जमाफीसंदर्भात काढलेला जीआर अटी-शर्थी लागू करणारा आहे. या जीआरमध्ये 2015 ते सप्टेंबर 2019 च्या मधलेच कर्ज पाहिजे, त्याच काळात ते कर्ज थकबाकीत गेले पाहिजे, पीक कर्जच पाहिजे, मुदत कर्ज चालणार नाही, अल्पमुदत कर्ज चालणार नाही अशाप्रकारच्या अनेक अटी सरकारने टाकल्या आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा काहीच फायदा होणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. तसंच ही सरसकट कर्जमाफी नाही तर सरसकट धोकेबाजी आहे अशी टीका त्यांनी केली आहे.
तसंच, राज्यामध्ये ऑक्टोबर 2019 च्या तिसऱ्या आठवड्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. 60 ते 70 लाख शेतकरी अवकाळी पावसामुळे कर्जबाजारी झाले आहेत. सरकारने कर्जमाफीमध्ये चालाखी करत सांगितले की ज्याचे कर्ज सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत असेल त्यालाच सरसकट कर्जमाफी मिळेल. म्हणजे ऑक्टोबरमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.