राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची नुकसानग्रस्तांना ग्वाही
भवानीनगर (वार्ताहर) – सणसर (ता. इंदापूर) येथे अतिवृष्टीमुळे इंदापूर तालुक्यात सर्वात जास्त नुकसान झाले आहे. यामध्ये घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत शासन आपल्या पाठीशी आहे, असे मत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
अतिवृष्टीमुळे येथील ओढ्याला पूर आल्याने अनेकांची घरे वाहून गेली. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आपत्तीग्रस्त कुटुंबांना शरयु फाऊंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी शरयु फाउंडेशनच्या माध्यमातून गृहपयोगी वस्तू यामध्ये ताट, वाटी, तांब्या व इतरही साहित्य वाटप करण्यात आले. सणसर येथील आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात देताना ते बोलत होते. लोकप्रतिनिधी या नात्याने शासन आपल्या पाठीशी आहे. याबाबत शासनाच्या वतीने पंचनामे करण्यात आले आहेत. या आपत्तीग्रस्तांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.
दिवाळी जवळ आल्याने या आपत्तीग्रस्तांच्या समोर जी वेळ आली आहे, तशी वेळ कोणावरही येऊ नये. यावेळी 550 नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले. यावेळी ऍड. रणजीत निंबाळकर, डॉ. दीपक निंबाळकर, हेमंत निंबाळकर, बाबाजी निंबाळकर, विक्रम निंबाळकर, पार्थ निंबाळकर, सागर भोईटे, दादा कांबळे, शुभम निंबाळकर, यशवंत नरुटे, धनंजय गायकवाड, श्रीनिवास कदम, वसंत जगताप, अमोल भोईटे आदी उपस्थित होते.