नवी दिल्ली : देशात करोनाची दुसरी लाट सुरु असून अनेकांचे जीव गेले आहेत. त्यात देशात लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरणाची मोहीम काही राज्यात थांबवण्यात आली आहे. या सर्व मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
LIVE: My interaction with members of the Press about GOI’s Covid vaccine disaster. https://t.co/YbC8iSe4aw
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 28, 2021
आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारपरिषद घेत मोदी सरकारवर निशाणा साधला. यावेळी राहुल गांधी म्हणाले, “अनेकदा सरकारला करोना संदर्भात सतर्क केलं होतं. मात्र सरकारने आमची चेष्टा केली. आणि जसं की तुम्ही पाहिलं पंतप्रधान मोदींनी विजय घोषित केला, करोनाला हरवले असल्याचे म्हटले. अडचण ही आहे की, सरकारला व पंतप्रधानांना करोना समजलाच नाही, आजपर्यंत समजला नाही.”
तसेच, “करोना केवळ एक आजार नाही, करोना हा बदलत असलेला आजार आहे. जेवढा वेळ तुम्ही त्याला द्याल, जेवढी जागा तुम्ही त्याला द्याल, हा तेवढाच घातक होत जाईल. मी मागील वर्षी फेब्रुवारीत म्हटलं होतं, जागा बंद करा. करोनाला तुम्ही वेळ देऊ नका, जागा देऊ नका, दरवाजा बंद करा.” असंही यावेळी राहुल गांधी म्हणाले.