उत्तम पिंगळे
महाराष्ट्राच्या दृष्टीने अच्छे दिन येऊ घातले आहेत असे वाटू लागलेले आहे. शेवटी कोणत्याही गोष्टीचा पाया मजबूत असावा लागतो आणि तेच आता नवे सरकार करू पाहात आहे.
मान्य आहे कर्जमाफी अजून शेतकऱ्यांच्या हाती पडलेली नाही पण एप्रिलनंतर ती नक्कीच पडेल. आता पाहा, समजा कुठे आत्महत्या झालीच. कुणाची काय? शेतकऱ्यांची व तीही जास्त विदर्भ व मराठवाड्यात तर लागोलाग आमदार तेथे पोहोचू शकणार आहेत. त्या कुटुंबाला चार सांत्वनाचे शब्द सांगू शकणार आहेत (पैसा काय कधीही मिळेल) पण मनोधैर्य देणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी मान्यवर जबाबदार व्यक्ती लागोलाग भेटणे हे महत्त्वाचे आहे.
आता विजेबाबत दिल्ली पॅटर्न महाराष्ट्रात आणायचा आहे असे सरकार म्हणत आहे. मुळातच विजेमधील चोरी व गळती या दोन गोष्टींवर जर आपण नियंत्रण आणू शकलो तर ते सहज शक्य आहे. पण सध्या विजेचा तुटवडा भासत असल्यामुळे शेतकऱ्यांना निश्चित दिलेल्या वेळेवरच वीज पंपांना वीज मिळत असते. मग त्यांच्या काही तक्रारी असतील तर जागेवरच तपासणी करून त्यातून तोडगा काढणे सहज शक्य आहे. कारण आता आमदार तेथे ताबडतोबीने जाऊ शकतील. मात्र, नुकताच करोना व्हायरस हातपाय पसरू लागला आहे. कित्येकांनी आधीच भीती घेतलेली आहे. त्यांना धीर देणे व नीट समजून सांगणे महत्त्वाचे आहे अशा करता स्थानिक आमदारापेक्षा कोणती व्यक्ती योग्य असू शकते? त्यामुळे ही भीती घालवण्यासाठी आता आमदार तत्परतेने आपल्या मतदारसंघात जाऊ शकणार आहेत.
आता आपल्या मतदारसंघात समजा कुणाचे लग्न आहे किंवा एखाद्या विद्यार्थ्याने काही महत्त्वाची कामगिरी केली वा एखाद्या खेळाडूने कुठले पदक जिंकले असेल तर अशा वेळी आमदार आपल्या मतदारसंघात व्यक्तिश: त्याला भेटून त्यांचे कौतुक करू शकणार आहेत.
दुर्दैवाने कुठे अपघात झाला मग तो रस्त्यावरचा असो वा कुणा कारखान्याचा, अशा वेळी तेथे आमदार स्वतः जातीने जाऊन भेटले तर यंत्रणा तातडीने काम करू शकेल. तसेच आमदारांच्या उपस्थितीमुळे पीडितांच्या नातलगांना दिलासा मिळेल. कुठे अचानक स्थानिक पातळीवर बंडखोरी होत असेल तर आमदार स्वतः जातीने तिथे जाऊन सोक्षमोक्ष लावू शकणार आहेत. तसेच मतदारसंघात कोणी युवा कार्यकर्त्यांनी आमदार चषक आयोजित केला असेल तर आमदार स्वतः जातीने तेथे जाऊन युवा कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवू शकणार आहेत.
असो एकीकडे राज्यावरील कर्ज फेडावयाचे आहे, तसेच कृषी कर्जमाफी अजून बाकी आहे, अंगणवाडीसेविकांचा वाद अजून शमलेला नाही. “शिवशाहीच्या’ प्रतापाने एसटीसुद्धा खिळखिळी झालेली आहे आणि आता आपल्या सर्वसामान्य नेत्यांसाठी म्हणजेच आपल्या आमदारांसाठी सरकारने शून्य टक्के व्याजाने चारचाकी घेण्याकरता तीस लाखांचे कर्ज देऊ केलेले आहे. म्हणूनच आपले आमदार आता वरील सर्व सेवा करण्याकरता सदैव तत्पर राहणार आहेत. म्हणूनच सांगतो ही खूशखबर असून आता महाराष्ट्राला चांगले दिवस येणार आहेत.