मुंबई – संपूर्ण देशात करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता, लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येत आहे. त्याआधीच भारतात तयार झालेल्या भारत बायोटेकच्या लसीसंदर्भात दिलासा देणारं वृत्त आलं आहे. अर्थात करोनाशी झुंज देणाऱ्या भारतीयांसाठी ही गुड न्यूज आहे.
हैद्राबादच्या भारत बायोटेकने तयार केलेल्या ‘कोव्हॅक्सीन’ या करोना प्रतिबंधक लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये लस किती प्रभावी आहे हे सांगण्यात आलं आहे. या लशीचा सरासरी प्रभाव ७८ टक्के असून लक्षणे नसलेल्या रुग्णांवर ही लस ७० टक्के प्रभावी आहे. तर गंभीर करोना रुग्णांवर ही लस १०० टक्के प्रभावी आहे. या लशीमुळे करोना रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी होऊ शकतं. तसेच ही लस ‘डबल म्युटंट’ करोनाविरोधात प्रभावी असल्याचे आसीएमआरने म्हटलं आहे.
दरम्यान देशातील लसीकरण मोहिमेला अधिक वेग देण्यासाठी भारत बायोटेक पुढच्या महिन्यात कोव्हॅक्सिनच्या तीन कोटी डोसची निर्मिती करणार असून वर्षाला ७० कोटी डोसची निर्मिती करणार असल्याचं भारत बायोटेकचे प्रमुख कृष्णा एल्ला (Krishna Ella) यांनी मंगळवारी सांगितलं.