मुंबई – महाराष्ट्रात साधारणत: महिनाभरापासून करोनाबाधितांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. मात्र, सध्या आढळणारा विषाणू हा मे आणि जून आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आढळणाऱ्या विषाणूंपेक्षा कमी घातक असल्याचे मत राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळेच एक मार्चपासून जवळपास 40 टक्क्यांनी बाधित संख्या वाढूनही मृत्यूच्या संख्येत फार वाढ झालेली दिसत नाही.
करोना बाधितांची संख्या वाढत आहे. मात्र, बाधितांचा मृत्यूदर घटत आहे. गेल्या आठवड्यात हा मृत्यूदर 0.55 टक्के होता. कमी घातक विषाणूंमुळे हे घडत असल्याचा दावा राज्याचे साथरोग विभाग प्रमुख प्रदीप आवटे यांनी केला.
महाराष्ट्रात पहिला बाधित गेल्या वर्षी नऊ मार्चला आणि मुंबईत 11 मार्चला सापडल्यानंतर वर्षभराने उच्च संसर्गक्षमता आणी कमी हानिकारकता सिध्दांत लागू पडत आहे. त्यामुळे यावर्षी (2021) 3.5 लाख बाधित सापडले तर तीन हजार 202 जणांचे मृत्यू झाले. राज्यातील मृत्यूदर मार्च 2020 मध्ये 2.3 टक्के होता. तो नवीन वर्षात झपाट्याने घसरला. अमरावतीसारख्या काही जिल्ह्यांच्या दोन ते विभागात बाधित वाढू लागल्यानंतर जानेवारीत तो 1.7 टक्के होता. तर फेब्रुवारीत तो 0. 9 टक्क्यांवर आला.
राज्याच्या करोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले, करोनाच्या आकडेवारीची फेररचना करण्यात आली. ती जानेवारी 2021 पासून पुन्हा मोजण्यास सुरवात केली. कोणत्याही साथीचे गांभीर्य समजण्यासाठी मृत्यूदर हा त्यातील सर्वात महत्वाचा घटक असतो. 2021 मध्ये करोनाचा मृत्यू दर जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केल्या प्रमाणे एक टक्क्याच्या खाली आला आहे.
मुंबईत जानेवारीपासून मृत्यूदर जानेवारीपासून 0.9 टक्क्यांखाली आला. राज्यात अन्यत्रही अशीच स्थिती आहे. फेब्रुवारीत मृत्यूदर 0.7 टक्क्यापर्यंत खाली आला. मार्चमध्ये आतापर्यंत हा दर 0. 3 टक्के आहे.
बाधितसंख्या चिंतेचाच विषय
यातील बहुसंख्य बाधित लक्षणे नसणारे आहेत किंवा काही जणांना मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. त्यामुळे बाधितांना घरीच उपचार करण्यात येत आहेत. मृत्यू दर कमी झाला हा दिलासा असू शकतो. मात्र, रोज आढळणारे नवे बाधित हा चिंतेचा विषयच आहे, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.