जागेसाठी होणारे वाद थांबण्याची शक्यता
नवी दिल्ली : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. विनाआरक्षित डब्यामधून प्रवास करण्यासाठी लवकरच बायोमॅट्रीक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस येथून लखनऊला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे आता इतर ट्रेनमध्ये देखील बायोमॅट्रीक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
रेल्वेमध्ये अशा प्रकारची यंत्रणा सुरू झाल्यानंतर बायोमॅट्रीक मशीनचा वापर केल्यानंतर प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. काही दिवसांपूर्वी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी प्रवाशांचा प्रवास उत्तम व्हावा यासाठी महत्त्वाच्या निर्णय घेण्यात येतील असं सांगितलं होतं. बायोमॅट्रीक तंत्रज्ञानामुळे रेल्वेतून प्रवास करताना होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. याविषयी एका वृत्तवाहिनीने माहिती दिली आहे. मुंबईतील चार रेल्वे स्थानकावर बायोमॅट्रीक मशीन लावण्यात आली आहे. पुष्पक एक्स्प्रेसमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे. यानंतर आता आणखी काही ट्रेनच्या जनरल डब्यामध्ये बायोमॅट्रीक सुविधा लागू करण्याची तयारी केली जात आहे. गर्दीमुळे काही चुकीचे प्रकार होऊ नयेत यासाठी काळजी घेतली जात आहे. रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना बायोमॅट्रिक मशिनमधून जावे लागणार आहे. या मशिनवर आपल्या बोटाचे ठसे दिल्यानंतर प्रवाशाला एक क्रमांक दिला जातो. त्यामुळे गाडी प्लॅटफॉर्मवर लागल्यानंतर सीट बूक होणार आहे.