यशस्वी आर्थिक नियोजनासाठी प्रत्येक गुंतवणूकदारास काही महत्त्वाचे नियम शिस्तबद्ध पद्धतीने पाळावे लागतात. त्याला आपण सोनेरी नियम असे म्हणू शकतो.
१) आपल्या उत्पन्नाच्या किमान दहा टक्के रक्कम आपल्या निवृत्तीसाठी योग्य आर्थिक पर्यायामध्ये गुंतवा. आपल्या आयुष्याच्या सुरवातीच्या काळापासून मासिक उत्पन्नाच्या दहा टक्के रक्कम जर आपण आपल्या निवृत्तीच्या गरजांसाठी गुंतवण्यास सुरवात केली तर निवृत्तीपर्यंत आवश्यक रक्कम निश्चित उभी राहू शकते. कमी महागाई दर आणि मोठी पेन्शन मिळण्याचे दिवस केव्हाच निघून गेले आहेत. वेळोवेळी आपल्या जीवनशैलीमध्ये कायम सुधारणा होत असतात. त्यासाठीचे खर्च वाढत असतात. तसेच भविष्यात महागाईसुद्धा वाढत जाणार आहे. या सर्वांचा सारासार विचार केला असता मासिक बचत दहा टक्क्यांवरून वीस टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न केल्यास वाढलेल्या गरजांसाठी आवश्यक असणारी रक्कम उभारणे शक्य होते. भविष्यात येणारा वैद्यकीय खर्च, वाढत जाणाऱ्या राहणीमानाचा खर्च ही बचत करण्यासाठी भाग पाडतात.
२) गुंतवणूक करण्यासाठी कर्ज घेऊ नका. जास्त परतावा कमावण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत कर्ज घेऊ नये. असे करत असताना उत्पन्नापेक्षा खर्च कायमच कमी असणे आवश्यक आहे. बहुतांशी तरुण पिढी क्रेडिट कार्ड, मोबाईल पेमेंट अॅप यासारख्या साधनांचा वापर वेगवेगळ्या पेमेंटसाठी करत असतात. अनेक वेळा महिनाभरात क्रेडिट कार्डवर खरेदी केली आहे याचा आकडा मासिक उत्पन्नाच्या पुढे निघून गेला आहे, याचेही भान रहात नाही. अशा परिस्थितीत आपल्या उत्पन्नाचा आकडा कायम लक्षात ठेवून गरजेपुरतेच खर्च केल्यास आर्थिक चणचण भासत नाही.
३) गुंतवणूक करताना १२० मधून तुमचे वय वजा या सूत्रानुसार गुंतवणूक करा. अनेक आर्थिक नियोजनकार नेहमीच गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचे सूत्र देताना शंभर वजा गुंतवणूकदाराचे वय बरोबर शेअर अथवा शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडाच्या योजनेत गुंतवणूक करण्यास सांगतात. परंतु सध्याच्या काळात अद्ययावत वैद्यकीय सेवांमुळे सामान्य माणसाचे आयुर्मान वाढत आहे. तसेच प्रत्येकाच्या जीवनशैलीत सातत्याने सुधारणा होत आहे. यामुळेच भविष्यातील खर्चही वाढत आहेत. असे असल्याने गुंतवणुकीच्या सूत्रामध्ये शंभरऐवजी १२० घ्यावे. जेणेकरून इक्विटीमध्ये होणारी गुंतवणूक आपोआपच वाढणार आहे आणि याचा थेट परिणाम भविष्यातील संपत्तीनिर्मितीवर होणार आहे. वर उल्लेख केलेले आर्थिक सूत्र तरुण गुंतवणूकदारांनी निश्चितच अंगीकारले पाहिजे.
उदाहरणार्थ – जर गुंतवणूकदाराचे आजचे वय २० वर्षे आहे आणि निवृत्तीचे वय साठ वर्ष आहे, इक्विटी गुंतवणुकीत मिळणारा वार्षिक परतावा १२ टक्के व डेट गुंतवणुकीवर मिळणारा परतावा ८ टक्के आहे असे गृहित धरल्यास गुंतवणुकीचे सूत्र १२० वजा गुंतवणूकदाराचे वय = इक्विटी गुंतवणूक. या सूत्राचा वापर करत असताना गुंतवणूकदाराने एकदाच रू. १,००,००० गुंतवणूक करून सदर रक्कम निवृत्तीपर्यंत तशीच ठेवली तर पुढील प्रमाणे संपत्ती निर्माण होते.
अ) १०० – वजा वय
ब) १२० – वजा वय
वयाच्या २० व्या वर्षी १,००,००० रुपये गुंतवल्यास ६० व्या वर्षी मिळणारी रक्कम
अ) ————— ७८.७९ लाख रूपये
ब) ————— ९३.५ लाख रुपये
वयाच्या ३० व्या वर्षी १,००,००० रुपये गुंतवल्यास
अ) ————— २३.९९ लाख रुपये.
ब) —————- २७.९७ लाख रुपये
वयाच्या ४० व्या वर्षी १,००,००० रुपये गुंतवल्यास
अ) —————- ७.६५ लाख रुपये
ब) —————- ८.६५ लाख रुपये
आर्थिक नियोजनाचे सोनेरी नियम (भाग-२)
वयाच्या ५० व्या वर्षी १,००,००० रुपये गुंतवल्यास
अ) —————– २.६३ लाख रुपये
ब) —————– २.८२ लाख रुपये