पुणे -देशावर झालेल्या परकीय हल्ल्यांपासून मराठ्यांनीच दिल्ली राखली. दिल्लीचे संरक्षण केले हा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. या शौर्य आणि पराक्रमाची गाथा सांगणारे दिल्लीतील राष्ट्रीय अभिलेखागार सेंट्रल विस्टा प्रकल्पासाठी जमीनदोस्त करण्यात येणार आहे. पण, त्यातील मराठ्यांचा गौरवशाली इतिहास अधिक चांगल्या पद्धतीने जतन व्हावा, अशी अपेक्षा आता इतिहासप्रेमी व्यक्त करत आहेत.
सेंट्रल विस्टाच्या नूतनीकरणात जनपथ रस्त्यावरील सध्याची राष्ट्रीय अभिलेखागाराची इमारत पाडण्याचा संकल्प आहे. या अभिलेखागारात मध्य भारतातील मराठा संस्थानांबद्दलची आणि भाषावार प्रांतरचनेबद्दलची कागदपत्रे, महाराष्ट्रातील महारापुरुष- नेते, संस्थानिकांचे खासगी कागदपत्रे आहेत.
शास्त्रशुद्ध इतिहास संशोधनासाठी अतिशय मौल्यवान अशा या ऐतिहासिक दस्तावेजाचे संवर्धन कशाप्रकारे केले जाणार आहे, नूतनीकरणात कागदपत्रे कुठे व कसे संग्रहित केले जाणार आहेत, आणि संशोधकांना ती कशी उपलब्ध होणार आहेत, याबद्दल काहीच माहिती समोर आलेली नाही. तशी माहिती संशोधकांना स्पष्टपणे पुरवण्यात यावी. या सामूहिक मागणीसाठी इतिहासप्रेमींकडून एक ऑनलाइन याचिका मोहीम राबवली जात आहे. या चळवळीत देश तसेच देशाबाहेरील एकूण 3,793 नागरिकांनी आतापर्यंत सहभाग नोंदवला आहे. यामध्ये संशोधक, इतिहास अभ्यासक, प्रशासकीय अधिकारी, वकील, पत्रकार तसेच विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग आहे.
अभिलेखागारात या ऐतिहासिक ठेव्यांचा समावेश
या अभिलेखागारात सुमारे साडेचार लाख ऐतिहासिक दस्तावेज, 25,000 दुर्मीळ हस्तलिखिते, लाखाहून अधिक नकाशे, 2 लाख 80 हजार आधुनिक कालावधीपूर्व कागदपत्रे आणि काही खासगी कागदपत्रे यांचा समावेश आहे.