मुंबई : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यासह देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. हे प्रकरण शमले नाही तोपर्यंत आता भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाने त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे.
राज्यसभा खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी, ‘शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे पाच वेळेस माफी मागितली’, असे वक्तव्य केले आहे. या त्यांच्या वक्तव्याविरोधात राज्यभरातून टीका होताना पाहायला मिळत आहे. तर यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हेदेखील आक्रमक झाले असून संदर्भात त्यांनी एक ट्विट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्यावर निशाणा साधला आहे, “छत्रपती शिवाजी महाराजांवर आता हा भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला. आपल्या दैवतांवर एकेकाने चिखलफेक करून दुसऱ्या कुणाचं प्रतिमासंवर्धन करण्याचा तर हा डाव नाही ना? पण आता डोक्यावरून पाणी चाललंय. त्यामुळे डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं पाणी पाजण्याची वेळ आलीय. असे म्हणत त्यांनी भाजपाला इशाराच दिला असल्याचे दिसून येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांवर आता #SudhanshuTrivedi हा भाजपचा जंतू दिल्लीत वळवळला.
आपल्या दैवतांवर एकेकाने चिखलफेक करून दुसऱ्या कुणाचं प्रतिमासंवर्धन करण्याचा तर हा डाव नाही ना?पण आता डोक्यावरून पाणी चाललंय.
त्यामुळं डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं ‘पाणी पाजण्याची’ वेळ आलीय. pic.twitter.com/ilfAYBGh0o— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 20, 2022
दरम्यान, राज्यासह देभरात वीर सावरकरांच्या मुद्द्यावरून सुरु झालेल्या वादावर रोहित पवार म्हणाले होते, “काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात फूट पाडून ठाकरे गटाला अडचणीत आणण्यासाठी या मुद्द्याचा वापर होत असल्याचे त्यांनी म्हटले. सावरकर यांच्याविषयी माझा फारसा अभ्यास नाही. परंतु या प्रकरणी सर्वपक्षीयांसह विचारवंतांनी एका व्यासपीठावर येत चर्चा घडवून आणावी. खरा इतिहास जनतेसमोर आणावा. सावरकरांच्या विषयात राजकारण बाजूला ठेवून राहुल गांधी यांनी दाखवलेले पत्र, सावरकर यांचे लिखाण समजून घेतले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा गांधींचा कोणता दाखला या विषयी दिला? हे मला माहित नाही. परंतु अशा विषयात राजकारण करण्यात कोणाचेच हित नसल्याचे ते म्हणाले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतच्या केलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. ‘शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो असल्याचे कोश्यारी म्हणाले आहे. त्यावर रोहित पवार म्हणाले, राज्यपालांनी त्यांची वैचारिक पातळी दाखवलेली आहे. त्यांच्याकडे संविधानिक पद आहे. म्हणून त्या पदाकडे पाहतो. या आधी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले अशा अनेकांबद्दल बोलून त्यांनी त्यांची वैचारिक पातळी दाखवलेली आहे. परत एकदा त्यांनी तेच धाडस केलेलं आहे, आम्ही त्याचं निषेध करतो. महाराष्ट्राच्या संस्कृती विरोधात जाऊन ते असं वागत असतील तर त्यांनी या राज्यात राहू नये. असं मला वाटतं. माझ्या सह तमाम जनतेचं हेच मत आहे.