आ. कर्डिले : पोखर्डी गावातून पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू पाठविल्या
नगर – राज्यातील जलप्रलयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, हजारो नागरिक बेघर झाले आहेत. पूर परिस्थिती गंभीर असतांना महाराष्ट्र शासन पुरग्रस्तांना सर्वोतोपरि मदत देत असून, राज्यातून मदतीचा ओघ वाढत आहे. पोखर्डी गावातील नागरिकांनी व येथील हनुमान चालिसा मित्र मंडळाने पुढाकार घेऊन जीवनावश्यक वस्तू पाठवून माणुसकीची ही मदत मोलाची ठरेल, असे प्रतिपादन आ.शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
पोखर्डी येथे पुरग्रस्तांसाठी हनुमान चालिसा मित्र मंडळाने रोख रक्कम देऊन गावकऱ्यांना मदतीचे आवाहन करताच पोखर्डी ग्रामस्थांनी नैसर्गिक आपत्तीत राष्ट्रीय कर्तव्य समजून सुमारे 75 हजार रुपयांचे जीवनावश्यक वस्तू सांगली, कोल्हापूर येथील पुरग्रस्तांसाठी आ.कर्डिले यांच्या उपस्थितीत पाठविण्यात आली. याप्रसंगी अक्षय कर्डिले, रोहित चंगेडीया व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ.कर्डिले पुढे म्हणाले, संकटात प्रत्येकाने प्रत्येकाला मदत केली पाहिजे, राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वात जास्त तडाखा सांगली व कोल्हापूर या गावांना बसला, शासनाने मदतीसाठी पथके तयार करुन पाठविली असून, लाखो रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. बचाव कार्याबरोबर अन्न,धान्य, औषधे याचा पुरवठा केला आहे. शासनाच्या मदतीला असंख्य संस्था माणुसकीचे दर्शन देणारे लाखो हात पुढे आले आहेत. यामुळे पुरग्रस्तांना मदत मिळू लागल्याने लवकरच सर्व रहिवासी सुखरुप या संकटातून बाहेर येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त करुन इतर गावांनीही आपआपल्यापरीने पुरग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन केले. हे सर्व साहित्य कोल्हापुर व सांगली येथे पोहच करण्यासाठी रोहित चंगेडिया यांनी सहकार्य केल्याबद्दल ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.