वडापचालक, हातगाडीधारकांची मुजोरी; प्रवाशांमधून संताप
सुरेश डुबल
कराड – पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा दुवा म्हणजे कराड शहर. येथील बसस्थानकात हजारो बसेस रोज ये-जा करत असतात. मात्र या बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच अतिक्रमणाने हातपाय पसरले आहेत. अस्ताव्यस्त रिक्षा, चहाच्या टपऱ्या, चायनीजचे गाडे यांनी असे बस्तान मांडल्याने बस स्थानकात नेमका कुठून प्रवेश करायचा? असा प्रश्न आता प्रवाशांना पडला आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भविष्यातील दळणवळणाची समस्या ओळखून कराडला प्रशस्त बस स्थानक बांधण्यासाठी निधी दिला. या बस स्थानकाच्या बांधकामाला उशीर लागला खरा, मात्र आता काही महिन्यांपासून हे बस स्थानक प्रवाशांसाठी खुले झाले आहे. जेव्हा बसस्थानकाचे काम सुरू होते, तेव्हा या परिसरात असलेली हातगाडे सुरक्षित अंतरावर होते. मात्र त्यास मूर्त स्वरूप येताच तेथे हात गाड्यांनी गर्दी केली. आणि रिक्षा स्टॅंड ची संख्या अचानक वाढली.प्रवाशांना शहर परिसरातून ने-आण करून बसस्थानकात सोडण्यासाठी बाहेरील रिक्षाही उदंड झाल्या. त्यांनीही आपले बस्तान स्टॅंडच्या दारासमोरच मांडले. त्यामुळे बस स्थानकाच्या प्रवेश द्वार झाकोळले आहे.
दोन-दोन, तीन-तीन लाईन या रिक्षावाल्यांनी लावल्यामुळे व तीच स्थिती हातगाड्यांची असल्याने येथील रस्ता अरुंद झालेला आहे. इतर वाहनधारकांनी बस स्थानक परिसरात आल्यानंतर त्यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते, हे नित्याचेच झाले आहे. त्यावर वाहनधारकांनी रिक्षाचालकांना किंवा हातगाडी धारकांना याबाबत विचारले असता दमदाटी करण्यास हे रिक्षाचालक मागेपुढे पाहत नाहीत. जसे कि ते हे बस स्थानक आपल्याच मालकीचे असून तेथील परिसरही आपल्याच नावावर आहे, अशाच अर्विभावात काही रिक्षावाले असतात.
कराड शहराचे आकारमान लहान असल्याने शहर वाढण्यासाठी जागा नाही. याच्या उलट दिवसेंदिवस वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. याचाच परिणाम कोणीही अस्ताव्यस्त वाहने लावल्यास काही क्षणातच तिथे मोठे ट्राफिक जाम होऊ लागले आहे. ही परिस्थिती शहरभर निर्माण झाली आहे. मात्र बस स्थानक परिसरात अशा वाहतूक कोंडीला प्रवाशांसह पादचाऱ्यांना वेळोवेळी सामोरे जावे लागत आहे. वाहतूक कोंडी आणि परिसरातील अतिक्रमण यामुळे बस स्थानकाचे मुख्य प्रवेशद्वार अक्षरश: झाकोळले आहे. त्यामुळे नवख्या प्रवाशाला बस स्थानकात नेमके कोठून जायचे, असा प्रश्न काही अंशी पडत आहे.
वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?
बस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर वाहतूक शाखेचे कार्यालय आहे. वाहतूक पोलीस आपल्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांना ही वाहतूक कोंडी उघड्या डोळ्यात दिसते. मात्र ते या रिक्षाचालकांवर व अस्ताव्यस्त लावलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करतात. बघून ही न बघितल्याचे सोंग घेतात. त्यामुळे जनमानसात या वाहतूक पोलिसांच्या कामाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कारवाई करा आणि बसस्थानकाचा गुदमरलेला श्वास मोकळा करा? अशी अपेक्षा वाहनधारकांसह शहरवासीय करत आहेत.