वातावरण बदलाबद्दल जनजागृती करणाऱ्या भूमी पेडणेकरने आपल्या घराभोवती बाग विकसित केली आहे. त्यासाठी तिच्या आईने तिला विशेष मदत आणि मार्गदर्शनही केले आहे. स्थायी स्वरूपाच्या शेतीविषयाचा समावेश शालेय अभ्यासक्रमामध्ये करण्यात यावा, अशी भूमीची अपेक्षा आहे.
“शेतीबाबत शाळेत असतानाच मुलांना शिकवले जायला पाहिजे. आजकाल आपल्याला शेतीबाबत काहीही माहिती नाही. रोपे कशी लावायची, त्यांची निगा कशी राखायची, धान्य कसे पेरायचे, ते उगवते कसे, या सगळ्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही.” असे ती म्हणाली.
शेती अथवा बागकामाबद्दलचे आपले ज्ञान वाढवण्यासाठी तिने भरपूर पुस्तके वाचली. किमान पातळीवरचे ज्ञान वाढवण्यासाठी हा अभ्यास आवश्यकच आहे, असे भूमी म्हणाली. हा विषय खूप गुंतागुंतीचा, किचकट आणि केवळ शेतकऱ्यांशीच संबंधित असावा, हा समज दूर व्हायला पाहिजे, असेही ती म्हणाली.
पृथ्वीला पर्यावरण बदल, प्रदूषण आणि अन्य समस्या भेडसावत आहेत. त्यासाठी निसर्गप्रेमी राहणेच आपल्या आणि भावी पिढ्यांसाठी हितकारक आहे. तिच्या “शुभमंगल सावधान’ला नुकतीन तीन वर्षे पूर्ण झाली.
त्यानिमित्ताने त्या सिनेमाशी संबंधित इंटरव्ह्यूचा एक व्हिडिओ तिने सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. अतिशय संवेदनशील विषयाला खुमासदार पद्धतीने हाताळल्यामुळे हा आपला अगदी फेव्हरेट सिनेमा असल्याचे भूमीने म्हटले आहे.