एका गॅंगच्या तरुणाचा खून, तर दुसऱ्या गॅंगच्या सदस्यावर खुनी हल्ला
पिंपरी – सोमवारी रात्रीपासून ओटास्कीम, निगडी परिसरातील गॅंगवार उफाळून आले. एका गॅंगच्या तरुणाचा हा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने भोकसून खून केला. या घटनेला 24 तास उलटत नाही तोच प्रतिस्पर्धी गॅंगनेही खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपीच्या मित्रावर खुनी हल्ला केला. खुनी हल्ल्याची घटना मंगळवारी दुपारी ओटास्कीम निगडी येथे घडली.
आकाश उर्फ मोन्या गजानन कांबळे (वय 24, रा. भीमनगर, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत भरत दिलीप लोंढे (वय 20, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोहेल संतोष जाधव (वय 18), हेमंत खंडागळे (वय 18), गणेश धोत्रे (वय 18), यश उर्फ गोंदया खंडागळे (वय 19), वैभव वावरे (वय 21), श्रवण कुऱ्हाडे (वय 18, सर्व रा. ओटास्कीम, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोहेल याला मयत आकाश याने ‘काय रे कोठे चाललाय’ असे रागात विचारले. त्याचा राग मनात धरून आरोपींनी ओटास्कीम येथे अण्णाभाऊ वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर फिर्यादी आणि मयत आकाश बोलत थांबलेला असताना तिथे आले. आरोपींनी आकाशला पकडले. सोहेलने धारदार शस्त्र आकाशच्या पोटात खुपसले. गणेश धोत्रे याने कोयता उगारून शिवीगाळ केली तसेच परिसरात दहशत निर्माण करून आरोपी पळून गेले. सुरुवातीला या प्रकरणात खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान जखमी आकाशचा मृत्यू झाल्याने गुन्ह्यात कलमवाढ करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोन्या कांबळे याचा खूनाचा बदला घेण्यासाठी त्याचे मित्र टपून होते. खून झाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया उमटू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त ठेवणे व गस्त वाढविणे आवश्यक होते. मात्र परिसरात बंदोबस्त नसल्याचे नागरिकांची सांगितले. त्यामुळे मयताच्या मित्रांना खुनाचा बदला घेण्यासाठी आयतीच संधी चालून आली. मोन्या कांबळे याच्या खून प्रकरणातील आरोपीमध्ये उठबस असलेला शक्तीमान ऊर्फ सत्यवान प्रकाश कांबळे (वय 22, ओटास्कीम, निगडी) हा त्यांच्या तावडीत सापडला. आरोपींनी भर दिवसा आणि भर रस्त्यात आठ जणांनी त्याच्यावर सिमेटचे गट्टू आणि लाकडी दांडक्याने खूनी हल्ला केला. एकामागोमाग घडलेल्या दोन गंभीर स्वरूपाच्या घटनांमुळे ओटास्कीम परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुन्हेगारांऐवजी अधिकाऱ्यांचे फोन स्वीच ऑफ
गंभीर स्वरूपाचा गुन्हा केल्यानंतर आपण पकडले जाऊ नये म्हणून आरोपी आपला फोन स्वीच ऑफ करतात. मात्र निगडीत घडलेल्या दोन गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनीच आपले फोन स्वीच ऑफ केल्याचे दिसून आले. तसेच संचारबंदीच्या काळात गुन्हेगारांची टोळकी रस्त्यावर उतरुन गॅंगवार कसे काय करु शकतात? पोलिसांचा थोडाही वचक गुन्हेगारांवर उरला नाही का? असे अनेक प्रश्न या घटनांमुळे उपस्थित होत आहेत.