राहाता -वाढीव वीजबिले पाठवून महाविकास आघाडी सरकारने ग्राहकांना शॉक दिला आहे. तिजोरीत पैसा नसताना केवळ सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा सुरू आहेत. बिघाडी सरकारच्या फसव्या धोरणांचीच होळी रस्त्यावर उतरून करण्याची वेळ आली आहे. घोषणाबाज सरकारचा फ्यूजही आता उडाला असल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
महावितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना देण्यात आलेल्या वाढीव बिलांची होळी व सरकारच्या फसव्या धोरणांचा निषेध करण्यासाठी आ. विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोणी बुद्रुक येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी वीजबिलांची होळी करुन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी ज्येष्ठ नेते काशिनाथ विखे, एम. वाय. विखे, किसनराव विखे, नंदू राठी, सुभाषराव विखे, संचालक संजय आहेर, सिनेट सदस्य अनिल विखे, माजी सरपंच लक्ष्मण बनसोडे, माजी उपसरपंच अनिल विखे, रावसाहेब साबळे, अशोक धावणे, विक्रांत विखे, खंडू धावणे, संतोष विखे, अनिल विखे, शंकर विखे यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करताना आ. विखे पाटील म्हणाले, लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सामान्य माणसाला महावितरण कंपनीने वाढीव बिले पाठवून ग्राहकांवर आर्थिक भार टाकला आहे. या वीजबिलांची वसुली महावितरणने तातडीने थांबवावी. 100 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची मागणी सरकारकडे कोणीही केली नव्हती. परंतु सवंग लोकप्रियतेसाठी महाविकास आघाडीकडून केवळ घोषणा व आश्वासने दिली जात आहेत. ऊर्जामंत्र्यांनीच स्वत:च्या आश्वासनापासून पळ काढला आहे. त्यामुळे आता 100 युनिटपर्यंत वीजबिल माफ करण्याचा आग्रह राज्य सरकारकडे आम्ही धरणार आहोत, असेही ते म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारची मागील वर्षभरात फक्त घोषणाबाजी सुरू आहे. त्यांच्या कोणत्याची धोरणात व निर्णयात स्पष्टता नाही. केवळ निर्माण झालेल्या प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलीत करण्याचे काम मंत्र्यांकडून केले जात आहे. वीजबिल माफीची जनतेची मागणी दुर्लक्षित व्हावी, म्हणून राज्य सरकारने घाईत ऊर्जाधोरण जाहीर केले. तुमच्या तिजोरीत जर पैसाच नाही, तर मग घोषणा करता कशाला? अशा प्रश्न उपस्थित करुन आ. विखे पाटील म्हणाले, काही घडले तरी केंद्राकडे बोट दाखवायचे, हा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचा केवळ अपयश झाकण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील जनतेशी केलेल्या विश्वासघातामुळे या सरकारची फ्यूजच उडाली असल्याची खरमरीत टीका आ. विखे पाटील यांनी केली आहे. यावेळी वीजबिलांची होळी करून राज्य सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला.
शाळांबाबत मंत्र्यांतच एकवाक्यता नाही
शाळा सुरू करण्याबाबतही सरकारमधील मंत्र्यांची कोणतीही एकवाक्यता नाही. शिक्षणमंत्र्यांच्या निर्णयालाच राज्यमंत्री विरोध करतात. शिक्षकांच्या कोविड टेस्टसाठी कोणतीही सुसज्ज यंत्रणा नाही. सरकार पूर्णत: गोंधळलेल्या परिस्थितीत असून, विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यामध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यात सरकारला पूर्ण अपयश आले असल्याचेही यावेळी आ. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.