बंगळुरू – करोनामुळे अनेक लोकांचे प्राण जात आहेत. त्या लोकांच्या अंत्यसंस्कारांच्या बाबतीतही अत्यंत असंवेदनशीलता दाखवली जात असून सरकार अंत्यविधीचीही नीट व्यवस्था लाऊ शकत नाही ही बाब अत्यंत करुणाजनक आहे.
बंगळुरू शहराच्या आठही दिशांना वनखात्याच्या जमिनी आहेत. तेथे वनीकरणही अस्तित्वात नाही. त्यामुळे अंत्यविधीसाठी या जागांचा वापर केला जावा अशी सूचना कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी राज्य सरकारला केली आहे.
या आठ दिशांच्या जागावर प्रत्येकी एका जागेत रोज किमान 25 जणांचे अंत्यविधी केले जाऊ शकतात त्यावर सरकारने तातडीने विचार केला पाहिजे, असेही त्यांनी राज्य सरकारला सुचवले आहे.
सरकार कोविड रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन आणि औषधे पुरवू शकलेली नाही. निदान त्यांचा अंत्यविधी तरी नीट होईल याची काळजी तरी सरकारने घ्यायला हवी. अन्यथा लोक सरकारला शाप देतील असे ते म्हणाले. कोविड रुग्णांच्या हलाकीच्या स्थितीला आज पारावार राहिलेला नाही. ही स्थिती पाहून मन विषण्ण होत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.