पुणे – करोनाने मृत झालेल्या व्यक्तीवर केवळ गॅस शवदाहिनीतच अंत्यसंस्कार करण्यात येतील. यासाठी शहरातील विविध ठिकाणी 6 शवदाहिन्या तयार ठेवल्या आहेत. करोनाचे संक्रमण वाढत चालल्याने हा निर्णय घेतल्याचे महापालिकेच्या विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदूल यांनी सांगितले.
एसएसपीएमएस कॉलेजच्या मागे असलेल्या कैलास स्मशानभूमीतील विद्युत शवदाहिनी, औंध, बोपोडी, कात्रज, मुंढवा आणि वैकुंठ स्मशानभूमी या सहाच स्मशानभूमीतील विद्युत शवदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.
डॉ. नायडू हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल आणि रुबी हॉल क्लिनीकमध्ये करोनाने संक्रमित आणि मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार कैलास स्मशानभूमीतील विद्युत शवदाहिनीत होणार आहेत. दीनानाथ हॉस्पिटल आणि लवळे येथील सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज येथील बाधित मृतांवर औंध स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील. बोपोडी येथील रुग्णालयात मृत व्यक्तींवर बोपोडी स्मशानभूमीत, भारती रुग्णालयात मृत पावलेल्यांवर कात्रज स्मशानभूमीत, इनलॅक्स बुधराणी, नोबल हॉस्पिटल, कोलंबिया एशिया हॉस्पिटल आणि हडपसर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये मृत पावलेल्यांवर मुंढवा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील.
कर्वे रस्त्यावरील सह्याद्री हॉस्पिटल, कसबा पेठेतील सूर्य सह्याद्री हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल येथील मृतांवर नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. शहरात करोना बाधित ज्या ठिकाणी मिळाले आहेत त्या भागात महापालिकेकडून सर्व प्रकारचे उपाययोजना सुरू आहेत. विद्युत आणि गॅस शवदाहिनींना विनाब्रेक सुरू ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी या प्रत्येक शवदाहिनीची जबाबदारी प्रत्येकी एका इंजिनियरला देण्यात येणार आहे. ही जबाबदारी अतिरिक्त जबाबदारी देण्यात येणार आहे.
गॅस शवदाहिनीत अंत्यसंस्कार करण्याचे कारण
विद्युत दाहिनीमध्ये बांबूचा वापर करण्याची गरज पडत नाही. त्यामध्ये चेन असल्याने थेट शव दाहिनीमध्ये जातो. सोशल डिस्टन्सिंग ठेवणेही त्यामुळे सोपे जाते. कैलास स्मशानभूमीत विद्युत दाहिनीत विद्युत दाहिनीला सोडून गॅस शवदाहिनीत करोना बाधित मृतांवर अंत्यसंस्कार होतील.
सुरक्षा विषयक सामुग्री उपलब्ध होणार
स्मशानभूमीतील ऑपरेटर्स आणि हेल्पर्सना करोनाविरोधी ऍप्रन, हॅन्डग्लोव्हज, मास्क आणि कॅप उपलब्ध केले आहे. अंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा, साबण, टॉवेल आणि नॅपकिन उपलब्ध करून दिली आहे, सोडियम हायपोक्लोराइड लिक्विडची व्यवस्था तसेच फवारणीसाठी हॅन्डपंपची व्यवस्था करण्याची जबाबदारीही तेथील नियुक्त अधिकाऱ्यांवर सोपवली आहे.