पुणे(प्रतिनिधी) – मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला विभागात होणाऱ्या भुरट्या चोरांचे प्रमाण कमी करण्यासाठी आता माजी सैनिकांचा वॉच राहणार आहे. माजी सैनिक गस्त घालणार आहेत. बाजार बंद झाल्यापासून (दुपारी 2) ते दुसऱ्या दिवशी पहाटे तीनपर्यंत ही गस्त सुरू राहणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.
फळे, भाजीपाला विभागात विशेषत: शेतकरी माल विक्रीसाठी आणत असतात. कित्येकदा शेतकऱ्यांनी आणलेल्या माल व्यापाऱ्यांच्या गाळ्यावरून चोरी होण्याच्या घटना घडत असतात.
विशेषत; रात्रीच्या वेळी अशा घटना घडण्याची शक्यता अधिक असते. करोनाच्या परिस्थितीमुळे सध्या दुपारी दोनपर्यंत फळ, भाजीपाला विभाग सुरू असतो. तोपर्यंत बाजारात वर्दळ असते. त्यानंतर गर्दी कमी होते. घडणाऱ्या भुरट्या चोरींच्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते.
त्यांचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होते. या पार्श्वभूमीवर अशा घटनांना आळा घालण्यासाठी माजी सैनिकांचा वॉच राहणार आहे. त्यामुळे अशा घटना करणाऱ्यांवर वचक वाढणार आहे.