पुणे: मार्केट यार्डातील भुसार बाजारानंतर आता फळ, भाजीपाला, कांदा-बटाटा विभाग सुरू करण्यास बाजार समिती प्रशासनाला यश आले आहे. तब्बल 50 दिवसापासून बंद असलेले हे विभाग येत्या रविवारपासून (दि.31 मे) पासून सुरू होणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी दिली.
दररोज 400 वाहनांना बाजारात प्रवेश दिला जाणार असून, एका आडत्याला एका वाहनातून माल बाजारात आणता येणार आहे. नेहमीच्या तुलनेत निम्मे आडते कार्यरत राहणार असून, दुसऱ्या दुसरी दिवशी दुसरे निम्मे कामावर हजर राहणार असल्याचेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विभाग 10 एप्रिलपासून बंद होता. गुळ-भुसार विभाग सुरू होता. दरम्यान, काही व्यापाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याने 19 मेपासून हा विभाग बंद ठेवण्यात आला होता.
त्यानंतर जिल्हाधिकारी, बाजार समिती प्रशासन आणि दि पुना मर्चंट्स चेंबरच्या बैठकीनंतर सोमवारपासुन (दि.25) गुळ-भुसार बाजार सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विभाग सुरू करण्यासाठी बाजार समितीने श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड, कामगार युनियन, तोलणार आणि विविध संघटनांची बैठक बोलाविली होती. त्यामध्ये या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला.