औरंगाबाद (विशेष प्रतिनिधी) : गाडीचा आवाज ऐकून आम्ही गडबडलो, आम्ही आरडा ओरडा करत त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. पण ते झोपेत इतके गाढ होते की आमचा प्रयत्न व्यर्थ ठरला… डोळ्यातून गळणारी आसवं आणि दाबलेला हुंदक्याला वाट करूनदेत या अपघातातून वाचलेले मजूर सांगत होते…
जालनामधील स्टील कंपनीत काम करणारे हे मजूर… काम बंद.. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झालेली… त्यातच करोना गाठायची टांगती तलवार… या पार्श्वभूमीवर त्यांनी मध्य प्रदेशमध्ये चालत आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला… औरंगाबाद जवळ करमाड हद्दीत जवळपास 40-45 किमीचा टप्पा ओलांडल्यावर ते थकले. रेल्वे बंद आहेत अशा भ्रमात त्यांनी रेल्वे रुळावरच पथारी पसरली.
मजुरांच्या गटातील तीन जण बाजूच्या सपाट जागेत झोपले. त्यांना जाग आली, त्यांनी आरडा ओरड करत या आपल्या सहकाऱ्यांना उठवण्याचा प्रयत्नही केला. मात्र व्यर्थ… भरधाव वेगात आलेल्या मालगाडीखाली डोळ्यांदेखत या तिघांच्या अंगावरून ही रेल्वे धडधडत गेली…
इंदरलाल धुरवे (वय 20, जिल्हा मांडला), विरेंद्रसिंह गौर (वय 27, जिल्हा उमारिया), शिवमसिंह गौर (वय 27, जिल्हा शाहडोल) आणि जखमी सज्जनसिंह (जिल्हा खाजेरी) यांचा वाचलेल्यांमध्ये समावेश आहे.
बचावलेल्या तीन जणांशी मी बोलले आहे. त्यांना जालनाहून भूसावळला जायचे होते. हे अंतर साधारण 30-40 किमी आहे. मध्यातच ते थकून झोपले. या तिघांनी आरडा ओरडा करून झोपलेल्यांना उठवण्याच प्रयत्न केला. मात्र तेवढ्यात मालगाडी त्यांच्या अंगावरून गेली. या दुर्देवी घटनेत, 20 पैकी 16 जण मरण पावले. तर तीन जण सुरक्षित आहेत. एक जखमी झाला आहे.
मोक्षदा पाटील
पोलिस अधिक्षक