-अमित डोंगरे
सवाल जिस जबान में किया जाए, जवाब उसी जबान में देना जरुरी होता है, असे म्हटले जाते. ऑस्ट्रेलियाच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी भारतीय संघानेही आक्रमकताच दाखवली पाहिजे. महंमद अझरुद्दीनच्या संघासारखे मवाळ धोरण ठेवले तर ऑस्ट्रेलियाचा संघ आपली केव्हा वळकटी करेल सांगता येणार नाही.
महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीच्या आक्रमकतेपेक्षा सौरव गांगुलीच्या आक्रमकतेने हा सामना खेळला तरच अजिंक्य रहाणेच्या संघाला या कसोटीत यशाची खात्री देता येइल. क्रिकेटच्या परिभाषेत असे म्हटले जाते की आक्रमकता हेच बचावाचे योग्य धोरण असते. खरे आहे या मालिकेतही हेच सातत्याने दिसले आहे.
विशेषतः ऍडलेडचा सामना गमावल्यानंतरही भारतीय संघाने आक्रमक मानसिकता ठेवण्यात यश मिळवले व त्यामुळेच संघाने पलटवार करताना मेलबर्न कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी साधली. त्यानंतर सिडनीला वर्णद्वेषी टीकेला तोंडी उत्तर देण्यापेक्षा कांगारूंच्या नाकावर टीच्चून खेळपट्टीवर ठाण मांडले व सामना वाचवला. ही जीगर व धमक पूर्वी भारतीय संघ क्वचितच दाखवत होता. आता मात्र, गेल्या दोन दशकांत भारतीय संघ कात टाकून उभा राहिला आहे आणि ऑस्ट्रेलियावर सातत्याने वर्चस्वही राखत आहे.
या कसोटीत उतरताना संघाला प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीने सतावले असले तरीही मानसिकता मात्र आजही खंबीर आहे. रहाणेच्या नेतृत्वात भर मैदानावर आक्रमकता दिसत नसली तरीही ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरात घूसून मारण्याची धमक या संघात निश्चितच आहे. जशास तसे उत्तर देण्याच्या भारतीय संघाच्या नव्या वृत्तीसमोर बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाचीही मानसिकता किती ढासळू शकते हेच सिडनी कसोटीत सिद्ध झाले.
भारतीय संघाने दुसरा डाव खेळताना जी जिगर दाखवली ती पाहून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनीचा तोल ढळला, त्याने स्लेजिंगही करुन पाहिले पण त्याला भारतीय फलंदाजांनी भीक घातली नाही.
स्टिव्ह स्मिथने ऋषभ पंत बाद व्हावा यासाठी त्याचा गार्डमार्कही पुसून टाकण्याचा केवीलवाणा प्रयत्न केला मात्र, त्या सगळ्यावर मात करत भारतीय संघाने 100 पेक्षा जास्त षटके अखेरच्या दिवशी खेळून सामनाही वाचवला.
हेच असे धक्के किंवा असे प्रतिकार ऑस्ट्रेलियाला यापूर्वी कोणत्याही संघाकडून मिळालेला नाही, त्यामुळे त्यांना याची सवयच नव्हती. गेल्या दोन दशकांपासून भारतीय संघाने सातत्याने कांगारुंचा नक्षा उतरवला आहे. असे म्हणतात की पाकिस्तानच्या जावेद मियांदादने चेतन शर्माच्या अखेरच्या चेंडूवर षटकार मारुन संघाचा विजय साकार केला होता पण त्यानंतर पाकिस्तानचा संघ समोर आला की भारतीय संघाची कामगिरी खालावली जात होती. त्यात गुणवत्तेची कमतरता नव्हती तर मानसिकताच घाबरट बनली होती.
नेमकी हीच गोष्ट शारजातील सचिन तेंडुलकरच्या लागोपाठच्या दोन शतकी खेळीने ऑस्ट्रेलियाच्या बाबतीतही घडली. त्यामुळे त्यानंतर जेव्हाही हे दोन संघ समोरासमोर आले तेव्हा जवळपास 90 टक्के सामन्यांत भारतीय संघानेच कांगारूंवर वर्चस्व राखले आहे. आता देखील तशीच परिस्थिती आहे. त्यांनी आपल्या संघाला सातत्याने डीवचले आहे.
सिडनीत तर हिनतेचा कळस करत वर्णद्वेषी टीकाही झाली पण त्यामुळे भारतीय संघाचे मनोधैर्य खालावले नाही तर आपण त्यांना प्रचंड जिद्दीचे दर्शन घडवले. आता याच खेळाची पुनरावृत्ती ब्रिस्बेनवरही व्हावी व भारतीय संघाने आक्रमकच राहून खेळ करावा. कारण ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना नरमाईची भाषाच कळत नाही, म्हणून आक्रमकता हेच धोरण हवे.